मुंबई – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे शपथविधीसाठी नियमावली ठरवून देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पत्र लिहून संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या प्रमुखांना आपली भूमिका स्पष्ट केली. शपथविधी घेताना आपल्या आराध्य व्यक्तींची नावं जोडून शपथ घेण्याला अटकाव बसावा, यासाठी त्यांनी ही मागणी केली आहे.
याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यालयाने ट्विट करत माहिती दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की, नव्याने निवडून आलेले काही संसद सदस्य आणि विधानमंडळ सदस्य निर्धारित केलेली शपथ न घेता आपल्या पक्षाचे आणि आराध्य व्यक्तींची नावे जोडून शपथ घेतात. त्यामुळे शपथविधीचे गांभीर्य कमी होते. शपथ ग्रहण प्रक्रियेसंदर्भात सर्व संबंधितांकरिता निश्चित अशी मार्गदर्शक तत्त्वे/आचारसंहिता ठरवून द्यावी, अशी विनंती या पत्रात नमूद केली आहे.
दरम्यान, भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथविधीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाची घोषणा दिली. यावर राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेत समज दिली.
यानंतर महाराष्ट्रात मोठा गदारोळ झाला. तसेच व्यंकय्या नायडूंच्या माफीची मागणीही झाली. त्याच पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंगह कोश्यारी यांनी हे पत्र लिहीत शपथविधी घेण्याबाबत निश्चित अशी मार्गदर्शक तत्त्वे / आचारसंहिता ठरवून देण्याची विनंती केली आहे.