पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) च्या 25 टक्के राखीव जागांच्या प्रवेशासाठी आठ दिवसांत तब्बल 1 लाख 10 हजार 242 पालकांनी आपल्या मुलांच्या प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज नोंदविले.
“आरटीई’ प्रवेश प्रक्रिया फेब्रुवारीपासून सुरू झाली. पहिल्या टप्प्यात प्रवेशासाठी 9 हजार 432 शाळांनी नोंदणी केली असून एकूण 96 हजार 658 जागा उपलब्ध झाल्या. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पालकांना ऑनलाईन अर्जासाठी 3 मार्चपासून “आरटीई’ पोर्टलवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. 21 मार्चपर्यंत पालकांना अर्ज नोंदणी करता येणार आहे. पोर्टलवर मार्गदर्शनपर व्हिडीओ, मार्गदर्शन पत्रिका उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.
आत्तापर्यंत पालकांकडून दररोज अर्ज नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. प्रवेशाच्या जागांपेक्षा जास्त अर्ज दाखल झाले आहेत. दोन दिवस तांत्रिक अडचणीमुळे पालकांना “ओटीपी’ जात नव्हता. यामुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद ठेवावी लागली होती.
पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक 985 शाळांची प्रवेशासाठी नोंदणी झाली असून यात 14 हजार 773 एवढ्या प्रवेशाच्या जागा दर्शविण्यात आलेल्या आहेत. या जांगासाठी आत्तापर्यंत पालकांकडून 30 हजार 266 अर्ज नोंदणी झालेली आहे. नाशिकमधून 6 हजार 649, मुंबईतून 6 हजार 656, औरंगाबादमधून 5 हजार 825, रायगडमधून 4 हजार 383 याप्रमाणे पालकांकडून अर्ज नोंदणी झालेली आहे. सिंधुदुर्गमधून सर्वात कमी 73 अर्ज दाखल झाले आहेत.