अहमदाबाद – भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत पराभूत झाल्यानंतर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने आश्चर्यकारक खुलासा केला आहे. या मालिकेत सहभागी होत असताना इंग्लंडचा संघ शारीरिकरीत्या सक्षम नव्हता, संघातील अनेकांचे पोट बिघडले होते तसेच अनेकांना प्रकृतीच्या विविध समस्याही भेडसावत होत्या, असे स्टोक्सने सांगितले आहे.
येथील खाण्यामुळे अनेकांचे पोट बिघडले. त्यातच तापमान अतिउष्ण असल्यानेही खेळाडूंना त्रास होत होता. भारतात या काळात क्रिकेट खेळणे आव्हानात्मक असते हे आम्हाला माहित होते मात्र, फेब्रुवारी महिन्यातच तापमान 41 अंशाच्या जवळपास होते त्यामुळेही खेळाडूंना वातावरणाशी जुळवून घेता आले नाही, असेही त्याने सांगितले.
संघातील अनेक खेळाडू आजाराने त्रस्त होते. पराभवानंतर आम्ही हे कारण देत आहोत असे नाही. संघातील प्रत्येक खेळाडू क्षमतेपेक्षाही जास्त सरस कामगिरी करण्यासाठी अपार मेहनत घेत होता मात्र, अनेक खेळाडूंना शारीरिक समस्यांचा सामना करावा लागला. संघातील अनेक खेळाडूंसाठी हा पहिलाच भारत दौरा होता. आता या पराभवातूनही खूप काही शिकता आले त्याचा भविष्यात फायदाच होणार आहे, असेही स्टोक्सने सांगितले.
कसोटी मालिका गमावली असली तरीही आगामी टी-20 व एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ सरस कामगिरी करेल. कसोटी व मर्यादित षटकांच्या सामन्यात फरक असतो व तीथे आजवरची आमची कामगिरी सरस झाली आहे, असेही स्टोक्सने सांगितले.