मुंबई – आर आर आरला ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर प्रत्येक भारतीयाने त्यांचे अभिनंदन केले. अशात आर आर आर टीमने हा पुरस्कार विकत घेतला असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या. यासाठी टीमने तब्बल 80 कोटी रुपये खर्च केल्याचं देखील बोललं जात होत. आता या सर्व चर्चांबाबत एसएस राजामौली यांचा मुलगा कार्तिकेय याने खुलासा केला आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, कार्तिकेयने एका मुलाखतीत याबाबत माहिती दिली. ऑस्कर पुरस्काराच्या कॅम्पेनिंगसाठी टीमने काही प्रमाणात खर्च केला परंतु ती रक्कम एवढी मोठी नव्हती.तसेच हे पैसे नेमके कशासाठी खर्च झाले याबाबत देखील त्याने सांगितले आहे.
जिथे मतदारांना मोठ्या प्रमाणात बोलावले जाते, तिथे जास्त पैसे खर्च केले जातात. राम चरण, ज्युनियर एनटीआर, प्रेम रक्षित, काल भैरव, राहुल स्पिलीगुंज यांसारख्या लोकांना अधिकृत आमंत्रणे पाठवण्यात आली होती. मात्र ते सोबत इतर कोणाला घेऊन येत असेल तर त्यासाठी अकादमीला मेलद्वारे कळवावे लागते. तसेच यासाठी वेगळे पैसे भरावे लागतील. ‘आरआरआर’ कडून प्रोग्रॅमसाठी गेलेल्या सर्व लोकांना पैसे देण्यात आल्याचे त्याने सांगितले. सर्वात वरच्या सीटसाठी प्रति व्यक्ती 750 रुपये आणि खालच्या सीटसाठी 1500 रुपये देण्यात आले असल्याचे त्याने म्हंटले.
ऑस्कर विकत घेतला या चर्चांबाबत तो म्हणाला,ऑस्कर विकत घेता येत नाही. त्यासोबत लोकांचे प्रेम आहे, जे विकत मिळवणं शक्य नाही. हा चित्रपट सर्वांच्या नजरेत आणण्यासाठी कॅम्पेनिंग प्रचारावर मोठा खर्च करावा लागतो असं स्पष्ट मत कार्तिकेयने यावेळी व्यक्त केले.
यावेळी तीन भारतीय चित्रपटांना ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते. ‘RRR’ व्यतिरिक्त, गुनीत मोंगाचा ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ आणि शौनक सेनचा ‘ऑल दॅट ब्रेथ्स’ यांचाही समावेश होता. यातील दोन चित्रपटांना ऑस्कर मिळाले, त्यात ‘आरआरआर’चा समावेश आहे. या चित्रपटाला ‘नाटु-नाटु’ या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे. भारतीय चित्रपटाला या श्रेणीत पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.