मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर त्यांनी पहिली पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मंडळी होती. या परिषदेत त्यांनी ‘माझं आडनाव गांधी आहे सावरकर नाही’ असं म्हणत पुन्हा एकदा वीर सावरकर यांचा अपमान केला. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून आता देशभरात याचे पडसाद उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान,त्यांच्या या वक्तव्यावर वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी राहुल गांधी यांच्यासह राज्यातील नेत्यांना खडा सवाल केला आहे. सत्तेत असताना वीर सावरकर यांचा अपमान उद्धव ठाकरेंनी कसा सहन केला? असा प्रश्न करत रणजीत सावरकर यांनी उत्तर मागितले आहे.
दरम्यान, वीर सावरकर यांच्यावरून केलेल्या वक्तव्यावर रविवारी झालेल्या सभेत वीर सावरकर यांचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही अते म्हणत उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना खडे बोल सुनावले. तर दुसरीकडे आज वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी ‘खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वीर सावरकर यांच्यावरून केलेली टीका योग्य नाही. जेव्हा उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा काँग्रेसने अश्लाघ्य भाषा वापरून वीर सावरकर यांंच्यावर टीका केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे गप्प का बसले? त्यावेळी काँग्रेसची भूमिका त्यांना पटली होती का? असा प्रश्न आता वीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी विचारला आहे.
दरम्यान, वीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध करून आम्ही राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढू अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केली. त्यानंतर आज सकाळी संजय राऊत यांनी यावर टीका करत ही अदाणी गौरव यात्रा आहे असं म्हटलं आहे. तसंच ढोंग्यांनी आम्हाला वीर सावरकर शिकवू नये असंही राऊत यांनी म्हटलं आहे.