मुंबई – दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री श्रिया सरनने ‘दृश्यम’ चित्रपटातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या अनेक दाक्षिणात्य चित्रपटातील कलाकार हे बॉलीवूडकडे वळत आहे. मात्र सध्या बॉलीवूडपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते आहे. RRR, पुष्पा, KGF यासारखे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले. यावर आता अभिनेत्री श्रियाने भाष्य केले आहे.
एका मुलाखतीत तिला साऊथ चित्रपट दिवसेंदिवस हिट होण्यामागे कारण काय आहे? यापैकी तुला कोणाची निवड करण्यास आवडेल? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने उत्तर दिले की, “कोणत्याही चित्रपटाचे कथानक जास्त महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. चांगल्या कथांना प्रेक्षक पसंती देतात आणि चित्रपटगृहांमध्ये जाऊन सिनेमे पाहतात. आता निर्माते आणि दिग्दर्शकांना हे कळले पाहिजे की, कितीही मोठा स्टार असो चित्रपट हा कथेच्या जोरावर बॉक्स ऑफिसवर चालतो.”
पुढे ती म्हणाली, “कोरोनानंतर परिस्थिती बदलली असून आता कलाकार एखाद्या चित्रपटाची निवड करताना सर्वात आधी स्क्रिप्ट आवर्जून पाहतात. आपण सतत नवनवे प्रयत्न करणे आवश्यक असते. साऊथ किंवा बॉलीवूड माझे दोन्ही चित्रपट हिट झाले आहेत. आरआरआर आणि दृश्यम दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.”
दरम्यान, अभिनेत्री श्रिया सरनने ‘दृश्यम’ चित्रपटात अजय देवगणच्या बायकोची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.