उपमहापौरांच्या प्रश्नांना अखेर मुहूर्त : उत्तरांमध्येही विरोधाभास
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या वर्षभरापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यातही अनेक भागांमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. याबाबत उपमहापौर तुषार हिंगे यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांच्याकडे 15 प्रश्नांची लेखी उत्तरे मागविली होती. ती उत्तरे देण्यासाठी तांबे गेल्या महिन्याभरापासून टाळाटाळ करत होते. आज अखेर महापालिका भवनमध्ये अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये रामदास तांबे यांना विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी लेखी मात्र गोल गोल फिरवणारी उत्तरे देत वेळ मारून नेली.
या वेळी महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक हर्षल ढोरे, राहूल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे आदी उपस्थित होते. शुद्ध आणि पुरेसा पाणी पुरवठा होत नसलेल्या एक महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीत उपमहापौर तुषार हिंगे यांनी पाणी पुरवठा विभागावर आगपाखड करत 15 प्रश्नांची यादी देत लेखी उत्तरे मागितली होती. या बैठकीत लोकप्रतिनिधींचा मोठा रोष अधिकाऱ्यांना पहायला मिळाला होता. उपमहापौर त्या बैठकीतून उठून बाहेर निघून गेले होते. प्रकरण इतके गंभीर झालेले असताना देखील पाणी पुरवठा विभागाने उत्तर देण्यास तब्बल एक महिना घेतला.
गढूळ पाण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला प्रशासनाने गढूळ पाण्याच्या पुरवठा होत असल्याचे मान्य केले परंतु सोबतच पाणी पिण्यासाठी सुरक्षित असल्याचे सांगितले. पाण्याची चाचणी केली असून सर्वच ठिकाणचे पाणी पिण्यायोग्य असल्याचा दावा केला आहे. प्रशासनाने पावसाळ्यामध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे कारण दिले आहे. तसेच जलवाहिनी फुटणे, नागरिकांच्या घरगुती टाक्या स्वच्छ नसल्यामुळे पाणी गढूळ होत असल्याचेही सांगितले आहे.
यंत्रणा सुस्थितीत आहे का यावर प्रशासनाने आवश्यक ती दुरुस्तीची कामे करण्यात आली आहे व आवश्यक असलेल्या मशीनची निविदा काढली आहे, असे उत्तर दिले. पाणी पुरवठा विभागाचे विद्युत, यांत्रिकी, रासायनिक, उर्जा आदी प्रकारचे ऑडिट अद्याप केलेले नाही. याबाबत लेखापरीक्षण करण्यात येत असल्याचे उत्तर प्रशासनाने दिले आहे. पाणी शुद्ध करण्यासाठी यंत्रणा सक्षम असून ती पुणे महापालिकेपेक्षा चांगली असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
पाटबंधारेचा अधिकारी बसवा
उपमहापौर तुषार हिंगे म्हणाले की, पाणीपुरवठा विभागाने अतिशय सुमार उत्तरे दिली आहेत. शहरातील नागरिकांना हे दररोज आणि स्वच्छ पाणी देऊ शकत नाही. या विभागामध्ये अधिकाऱ्यांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे. पाणीपुरवठ्याच्या सगळ्या कामांसाठी एकच ठेकेदार आहे. या विभागासाठी पाटबंधारे विभागाचा अधिकारी नेमण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.
नागरिकांनो, तुमच्याच टाक्या स्वच्छ करा
गढूळ पाणीपुरवठ्याबाबत प्रशासनाने सोयीस्कररित्या हात वर केले आहेत. गढूळ पाणीपुरवठा हा नागरिकांच्या घरगुती टाक्या अस्वच्छ असल्याने होत असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. एखा ठिकाणी जलवाहिनी फुटली तर त्यामधूनही गढूळ पाणीपुरवठा होत असल्याचे म्हटले आहे. घरगुती टाक्या स्वच्छ नसल्याने पाणीपुरवठा गढूळ होत असल्याचे प्रशासन एकीकडे सांगत आहे. तर दुसरीकडे पदाधिकाऱ्यांना तोंडी दिलेल्या उत्तरांमध्ये गढूळ पाण्यामुळे महापालिकेच्या टाक्या खऱाब होतात. त्या धुण्यासाठी जास्त पाणी खर्च होत असल्याचे सांगितले आहे.
नियमित पाणीपुरवठा नाहीच
धरणामध्ये शंभर टक्के पाणी असूनही शहरवासियांना पूर्ण क्षमतेने व रोज पाणी का नाही असा प्रश्न पदाधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये उपस्थित केला. त्यावर प्रशासनाने जोपर्यंत अतिरिक्त 30 एमएलडी पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत दररोज पाणी देणे शक्य नसल्याचे सांगतिले आहे. अतिरिक्त पाण्यासाठी आंद्रा-भामा आसखेड प्रकल्प किंवा वाघोलीवरून पाणी आणण्याचे नियोजन असल्याचा खुलासा प्रशासनाने केला आहे.