अमली पदार्थप्रकरणी सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला आरोपमुक्त ठरवण्यात आले. गेल्यावर्षी करोना काळात “ड्रग्ज ऑन क्रुझ’चे प्रकरण गाजले, तेव्हा संपूर्ण चित्रपटनगरी हादरून गेली होती. एकीकडे करोनामुळे चित्रपट व्यवसाय अडचणीत आलेला असताना दुसरीकडे आर्यन खानसारख्या प्रकरणाने मायानगरीची पुरती नाचक्की झाली.
एका जहाजावर बेकायदापणे अमली पदार्थाचे सेवन करणे आणि अमली पदार्थ बाळगणे याप्रकरणी आर्यन खानसह अनेकांना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. एनसीबीच्या या कारवाईचा बराच गाजावाजा झाला आणि सर्वांकडून कौतुकही झाले. हायप्रोफाइल प्रकरणात एनसीबीने कोणतीही कसूर ठेवली नाही, असे चित्र निर्माण झाले आणि अधिकाऱ्यांनी देखील मोठा भीमपराक्रम केल्याचे भासवले. एनसीबीचे अधिकारी आर्यन खानला टार्गेट करत नवनवीन धक्कादायक खुलासे करत होते. परंतु शेवटी सबळ पुराव्याच्या अभावी आर्यन खानला आरोपमुक्त करण्यात आले.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आर्यन खान निर्दोष असतानाही त्याला काही काळ तुरुंगात राहावे लागले. तो अमली पदार्थाचा व्यसनी आहे, अमली पदार्थाचा व्यापारी आहे, अशी अनेक बिरुदावली त्याच्या मागे लावण्यात आली. त्याला पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे सांगण्यात आले. यादरम्यान आर्यन खानविरोधात कोणतेही पुरावे नसल्याच्या बातम्या येत होत्या. आता सर्व काही समोर आले आहे. एनसीबीसाठी तर हे प्रकरण एका अर्थाने बूमरॅंग झाले असेच म्हणावे लागेल. ही बाब दु:खदच नाही तर लाजीरवाणे ठरली.
या बहुचर्चित प्रकरणात अन्य पाच आरोपींना देखील सबळ पुराव्याअभावी आरोपमुक्त केले. एनसीबीने 6 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. त्यात चौदा आरोपींचे नाव होते. छाप्यानंतर गाजावाजा करत तुरुंगात टाकलेला आर्यन खान हा आरोपी नसणे ही बाब एनसीबीसाठी विशेषत: अमली पदार्थ विरोधी अधिकारी समीर वानखेडे यांच्यासाठी लाजीरवाणी ठरली. कारवाईदरम्यान समीर वानखेडे यांना नायक म्हणून सादर करण्यात आले होते. राजकीय पातळीवर आरोप प्रत्यारोप केले जाऊ लागले. समीर वानखेडे यांची पत्नी देखील कारवाईच्या समर्थनार्थ रिंगणात उतरली.
सरकारने समीर वानखेडे यांची अन्य खात्यात बदली केली. समीर वानखेडे यांच्या बनावट जात प्रमाणपत्राचीच नाही तर आतापर्यंत केलेल्या कारवाईची चौकशी करण्याची गरज आहे. एक सरकारी खाते कोणत्याही पडताळणीशिवाय एखाद्याला अटक करते ही बाब सरकारप्रती नकारात्मक प्रतिमा उभी करणारी आहे. त्यांचा एखादा अधिकारी कोणालाही अटक करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतो, ही बाब धक्कादायक आहे. या कारवाईने शाहरुख खान, आर्यन खानबरोबरच चित्रपट उद्योगाची मोठी बदनामी झाली. त्याची भरपाई होऊ शकते का? अशा बाबतीत पीडिताने भरपाईचा दावा नक्कीच करायला हवा.
चुकीच्या पद्धतीने तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना दंड केल्यास भविष्यात अशा प्रकारच्या चुकीच्या कारवाईला चाप बसेल. काही अधिकाऱ्यांच्या बाबतीत असे सांगितले जाते, की ते तपासकामात हलगर्जीपणा दाखवतातच त्याचबरोबर ते भ्रष्टही असतात. आर्यन खानला कोणाच्या इशाऱ्यावरून टार्गेट केले तर नाही ना? हे देखील पाहिले पाहिजे. त्याचा बोलविता धनी कोण होता, याचा शोध घेतला पाहिजे.
क्रुझवर टाकलेला छापा हा केवळ देखावा होता का, की आणखी काही उद्देश होता? छापेमारी करताना त्याचा व्हिडिओग्राफी का केली नाही, मोबाइल ट्रेसिंगही योग्य रितीने केलेले नाही. अमली पदार्थाचे सेवन केले आहे की नाही याची वैद्यकीय तपासणी देखील केली नाही, असे अनेक अनुत्तरीत प्रश्न आहेत. याप्रकरणात ठोस पुरावे आणि चौकशी दिसत नसल्याने साक्षीदार देखील सहजपणे बाजूला झाले आणि एनसीबीच्या उच्चस्तरीय चौकशीतील हवा निघून गेली. अपयशाची ही कहानी एनसीबी खात्यासाठी धडा आहे. “खोदा पहाड, निकला चुहॉं’ हा वाक्प्रचार वारंवार अमलात आणणाऱ्या सरकारी खात्यांत व्यापक बदलाची वेळ आली आहे.
– सत्यजित दुर्वेकर