काही लोकांनी लवकरात लवकर श्रीमंत बनण्याची योजना म्हणून बिटकॉइनचा स्वीकार केला. ज्यांनी हे चलन अत्यंत स्वस्तात खरेदी करून त्याची विक्री केली, त्यांनी खूपच नफा कमावला. परंतु ज्यांनी हे चलन आपल्याकडे ठेवून दिले, त्यांचे प्रचंड नुकसान झाले.
बिटकॉइन या आभासी चलनामध्ये गुंतवणूक करण्याविषयी जगात बरीच चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी बिटकॉइनचे मूल्य आकाशाला भिडले होते. परंतु त्याचे मूल्य अचानक 30 टक्क्यांनी कोसळले. त्यामुळे बिटकॉइनसह अन्य क्रिप्टो करन्सीचा बुडबुडा फुटला आहे का, असा प्रश्न खुद्द गुंतवणूकदारच विचारत आहेत. 19 मे रोजी बिटकॉइन, इथेरियम, डॉजकॉइन यासह जवळजवळ सर्वच क्रिप्टो करन्सीमध्ये घसरण पाहायला मिळाली. त्यामागे अनेक कारणे आहेत.
क्रिप्टो करन्सीची खरेदी-विक्री ऑनलाइन केली जाते. सरकारे नोटा छापतात आणि चलनांचे मूल्य कमी-जास्त होत राहते. डिजिटल चलनाची सुरुवात 2009 मध्ये करण्यात आली होती, मात्र हे चलन कोणत्याही सरकारच्या अधिपत्याखाली असत नाही. बिटकॉइनची खरेदी-विक्री करण्याची कोणतीही अधिकृत व्यवस्थाही करण्यात आलेली नाही. एखाद्या नाण्याप्रमाणे किंवा नोटेप्रमाणे हे चलन आपल्या खिशात राहू शकत नाही, तर ते पूर्णपणे ऑनलाइन असते आणि कोणत्याही नियमाविना या माध्यमातून व्यापार केला जातो.
भारतामध्ये तर 2018 मध्ये रिझर्व्ह बॅंकेने क्रिप्टो करन्सीला समर्थन देण्याच्या मुद्द्यावरून बॅंका आणि वित्तसंस्थांना हे चलन स्वीकारण्यास प्रतिबंध केला होता. रिझर्व्ह बॅंकेने डिजिटल चलनामुळे होऊ शकणाऱ्या फसवणुकीचा मुद्दा उपस्थित केला होता. परंतु मार्च 2020 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने रिझर्व्ह बॅंकेच्या निर्बंधांविरुद्ध निकाल देत असे म्हटले होते की, सरकारने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी या संदर्भात कायदा करणे आवश्यक आहे.
गेल्या महिन्यात रिझर्व्ह बॅंकेने भारताची स्वतःची क्रिप्टो करन्सी आणण्याच्या आणि तिचा वापर सुरू करण्याच्या पर्यायांवर विचार सुरू असल्याचे गेल्या महिन्यात रिझर्व्ह बॅंकेने पुन्हा एकदा सांगितले होते. क्रिप्टो करन्सी बाळगणाऱ्यांना त्याची विक्री करण्यासाठी वेळ दिला जाईल, असे सरकारने सांगितले होते.
किती भारतीयांच्या जवळ क्रिप्टो करन्सी आहे, किंवा किती लोक या करन्सीच्या माध्यमातून व्यापार करतात, याबाबत कोणतीही माहिती वा आकडेवारी आमच्याकडे उपलब्ध नाही, असे सरकार सांगते. परंतु भारतीयांनी डिजिटल करन्सीमध्ये गुंतवणूक केली आहे तसेच महामारीच्या काळात त्यात वाढ झाली आहे, ही बाब निश्चित मानली जाते.
बिटकॉइनचा प्रारंभ झाला तेव्हा लोकांना त्याची फारशी माहिती नव्हती आणि तिचे मूल्यही कमी होते. परंतु महामारीच्या काळात गेल्या वर्षी लॉकडाऊन लागला. सरकारांनी अनेक प्रकारे प्रोत्साहन दिले आणि युरोप, अमेरिका, कोरिया, जपान आणि चीनमध्ये अनेक ऑनलाइन गुंतवणूकदार बाजारात उतरले. कारण त्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळत असल्यामुळे लोक त्या पैशांमधून हे चलन खरेदी करू लागले.
भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूकदार सुरक्षितता निधी असतो. जर गुंतवणूकदाराचे पैसे बुडाले तर एक्सचेंजकडून त्याची भरपाई दिली जाते. या प्रक्रियेचे नियमन सेबी करते. परंतु क्रिप्टो करन्सी किंवा आभासी चलनाच्या रूपात गुंतविलेल्या रकमेचे नियमन करणारी यंत्रणा नाही. जर अशा स्वरूपात गुंतविलेला पैसा बुडाला तर संबंधिताला ती कोणाचीच जबाबदारी मानली जात नाही. या चलनाचे मूल्य घसरल्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
मूल्यात घसरण झाल्यामुळे चीनकडून आपल्या वित्तसंस्था आणि पेमेन्ट कंपन्यांना क्रिप्टो करन्सीशी संबंधित देवाणघेवाण किंवा अन्य कोणत्याही प्रकारची सेवा देण्यासाठी प्रतिबंधही करावा लागला. ही बातमी बाजारात समजताच हाहाकार उडाला आणि पाहता पाहता काही तासांतच या चलनाचे मूल्य प्रचंड प्रमाणात कोसळले. या चलनाचे मूल्य घसरण्यास एकटा चीन जबाबदार नाही.
गेल्या आठवड्यात इलक्ट्रिक कार तयार करणाऱ्या टेस्ला कंपनीचे मालक आणि जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ऍलन मस्क यांनी अशी घोषणा केली होती की, पर्यावरणाच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आपल्या कारच्या विक्रीसाठी पेमेन्ट मोड म्हणून बिटकॉइन स्वीकारणे यापुढे टेस्ला बंद करेल. अर्थात, नुकतेच त्यांनी पेमेन्ट मोड म्हणून बिटकॉइनला स्वीकृती दिली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. ऍलन मस्क यांनी बिटकॉइनची स्तुतीही केली होती; परंतु अन्य क्रिप्टो करन्सी बाजारात आल्यानंतर त्यांची भूमिका बदलली.
क्रिप्टो करन्सीची एक समस्या अशी की, त्याची किंमत कशी निश्चित करायची? हा मोठा सवाल आहे. सोने, सोन्याचे दागिने आणि सोन्याची नाणीही असू शकतात; परंतु क्रिप्टो करन्सी हा केवळ एक “कोड’ आहे. जर आपण तो कोड तोडला (बिटकॉइन माइजिंग) तर मोठ्या प्रमाणावर वीज खर्ची पडते. काही लोकांनी लवकरात लवकर श्रीमंत बनण्याची योजना म्हणून बिटकॉइनचा स्वीकार केला, कारण या देवाणघेवाणीत अत्यंत कमी वेळात मोठा लाभ मिळतो.
ज्यांनी हे चलन अत्यंत स्वस्तात खरेदी करून त्याची विक्री केली, त्यांनी खूपच नफा कमावला, त्यांचे ठीक आहे, परंतु ज्यांनी हे चलन आपल्याकडे ठेवून दिले, त्यांचे प्रचंड नुकसान झाले. आभासी चलन कोणत्याही देशाच्या सरकारच्या अधिपत्याखाली येत नाही, असा इशारा विविध देशांच्या सरकारांनी आपापल्या नागरिकांना दिलेला आहे. परंतु तरीही अधिक कमाईच्या आमिषाने लोक त्याचा स्वीकार करतात.
काही दिवसांपूर्वी इंटरनेट कॉम्प्युटर नावाचे एक नवे नाणे बाजारात आले. एकाच दिवसात त्याचे मूल्य 45 डॉलर एवढे झाले. हे नाणे कुणी शोधून काढले आहे, याची माहिती कुणालाच नव्हती. भारतात आभासी चलनाद्वारे ट्रेडिंगची अनुमती देण्यात आलेली नाही. यावर कर कसा आकारला जावा, हेही कुणाला ठाऊक नाही. यावर प्राप्तिकर विवरणपत्र भरताना सरकार विचारणा करते, की आपल्याकडे क्रिप्टो करन्सी असल्यास माहिती द्यावी.
सध्या भारत करोनाच्या महामारीशी दोन हात करीत आहे. परंतु काही दिवसांनी का होईना, सरकारला आभासी चलनासंदर्भातील कायदा तयार करावाच लागेल. जर भारताने स्वतःचे आभासी चलन बाजारात आणले, तर लोक ते स्वीकारतात की नाही, हेही पाहायला हवे.
– कमलेश गिरी