गांधीजींवर देश-विदेशांत 300 पेक्षा जास्त पुस्तके लिहिली गेली आणि प्रकाशितही झाली. महात्मा गांधींचा सन्मान करण्यासाठी जगातील शंभरांहून अधिक देशांनी पोस्टाचे तिकीट जारी केले आहे. गांधीजींच्या 150 व्या जयंतीदिनी, 2019 मध्ये फ्रान्स, उजबेकिस्तान, तुर्की, पॅलेस्टाइन यांसह 69 देशांनी टपाल तिकीट जारी केले होते. महात्मा गांधीजींचे पुतळे केवळ भारतातच नव्हे तर जगातील 70 पेक्षा जास्त देशांमध्ये दिसून येतात.
आपल्याकडे राजकारणाचा एक धर्म असतो. राजकारणाच्या धर्माचे उदाहरण अशासाठी द्यावे लागत आहे की, राजकारणात आणि प्रेमात सर्वकाही माफ असते, असे नेहमी म्हटले जाते. राजकारणाव्यतिरिक्त व्यक्ती, समाज, कुटुंब, भाऊ, पती, पत्नी, आई, वडील, गुरू आदींसह प्रत्येक समूहाच्या कामांसाठी धर्म निर्धारित केले आहेत.
जे लोक निर्धारित धर्माचे पालन करत नाहीत, ते पतित मानले जातात. आपल्याकडे समाजाच्या प्रत्येक वर्गात पतितांची संख्या वाढतच चालली आहे, हे दुर्दैवी आहे. एवढेच नव्हे तर पतितांना लोकप्रियताही मोठी मिळू लागली आहे. उलट अशा प्रकारे लोकप्रियता मिळविणे हा काही लोकांचा धर्मच बनला आहे. बदनाम झालो तरी प्रसिद्ध झालो, अशी या लोकांची मानसिकता असते. नुकतेच या यादीत कालीचरण यांचे नाव सामील झाले आहे.
काही दिवसांपूर्वी जुन्या आखाड्याचे महामंडलेश्वर यति नरसिंहानंद यांनी गांधीजींविषयी आक्षेपार्ह शब्दप्रयोग केला होता. अभिनेत्री कंगना राणावतने अहिंसेची थट्टा करताना म्हटले होते की, दुसरा गाल पुढे केल्याने भीक मिळते; स्वातंत्र्य नाही. गांधीजींना उद्देशून तिने “सत्तेचे भुकेले’ आणि “चलाख’ या शब्दांचा वापर केला. हरियाणातील मंत्री अनिल विज यांनी म्हटले होते की, “गांधीजींनी खादीचा काही ट्रेड मार्क तर केलेला नाही ना? खादीसाठी नरेंद्र मोदी हे गांधीजींपेक्षा मोठे ब्रॅंड आहेत.’
उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष हृदयनारायण दीक्षित यांनी म्हटले होते, “गांधीजी कमी कपडे वापरत होते. ते केवळ एक धोतर वापरत असत आणि देश त्यांना “बापू’ म्हणत असे. जर कमी कपडे घालून कुणी मोठा होत असेल तर एक सिनेनटी गांधीजींपेक्षा मोठी बनली असती.’ अनंत हेगडे यांनी म्हटले होते की, “गांधीजींचा सत्याग्रह हे एक नाटक होते. उपोषणे आणि सत्याग्रह यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले नाही.’
ही केवळ मोजकी उदाहरणे आहेत. गोडसेने तर गांधीजींची केवळ एकदाच हत्या केली आणि त्याची शिक्षाही त्याला मिळाली; परंतु ही मंडळी तर कितीतरी वेळा गांधीजींची हत्या करीत आले आहेत. यांना तर शिक्षाही मिळत नाही. यातील कोणालाही सांगितले, की फक्त एक दिवस गांधीजींसारखे जगा, केवळ एक दिवस गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेचे पालन करा, तर त्यावरूनच आपल्याला कळू शकेल, की गांधीजींवर शेरेबाजी करण्यास ही मंडळी किती लायक आहेत. गांधीजींविषयी तोंड उघडताना आपल्याकडे काय-काय असणे गरजेचे आहे? गांधीजी केवळ परोपदेशकुशल नव्हते. त्यांनी दुसरा गाल पुढे करून पाहिले होते, की भीक मिळत नाही, तर दाखवून दिले होते की स्वातंत्र्य मिळते.
गांधीजींना सत्तेची भूक किती होती हे कंगना राणावतसारख्या अभिनेत्रीला सांगून काहीच उपयोग नाही. कारण सत्तेशी जवळीक साधण्याची तिला स्वतःला किती भूक आहे, हेच गेल्या काही दिवसांमध्ये स्पष्ट झाले आहे. अनिल विज हे व्यापाराच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहतात. त्यामुळे पेटेन्ट आणि ट्रेडमार्कविषयी विचार करणे त्यांच्यासाठी शक्य नाही.
समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, भाजप असा पक्षबदल करत करत अखेर विधानसभेच्या अध्यक्षपदाची खुर्ची मिळविणाऱ्या हृदयनारायण दीक्षितांना कपड्यांव्यतिरिक्त गांधींमध्ये काही दिसत नाही. जर राखी सावंतच्या कपड्यांपर्यंतच त्यांची नजर जात असेल, तरीही गांधीजींना का दोषी ठरवायचे? जर स्वतःला लेखनात प्रस्थापित करण्यासाठी त्यांना “हिंद स्वराज्य का पुनर्पाठ’ पुस्तक लिहावे लागत असेल, आपल्या रचनेचे अनावरण आपल्या कार्यकाळाच्या अंतिम दिवसांत करवून अमर होण्याचे काम करावे लागत असेल, तर गांधी आणि राखी सावंत यांच्या कपड्यांमधील साधर्म्य शोधण्याचा अधिकार त्यांना कुठून मिळतो? राहता राहिला अनंत हेगडेंचा विषय, तर ते वादग्रस्त विधाने करण्यासाठीच प्रसिद्ध आहेत.
त्यांनी म्हटले होते की, भारतीय तरुणांमध्ये कौशल्य विकसित करण्याच्या मार्गावर आपण चालत राहू आणि भुंकणाऱ्या भटक्या कुत्र्यांकडे लक्ष देणार नाही. त्यांनी धर्मनिरपेक्षता या शब्दाचाही अवमान केला होता आणि असे म्हटले होते की, हा शब्द घटनेच्या प्रस्तावनेतून वगळण्यासाठी भाजप सरकार “घटनादुरुस्ती’ करेल. कर्नाटक प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष दिनेश गुंडूराव यांनी केंद्रीय मंत्री म्हणून हेगडे यांचे योगदान काय, असा सवाल केला, तेव्हा हेगडे यांनी राव यांना “मुस्लीम महिलांच्या मागे धावणारा मुलगा’ म्हटले होते.
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना उद्देशून, आक्षेपार्ह शब्दप्रयोग केला होता. हेगडे आणि विज यांनी पदवी प्राप्त केली आहे. कंगना राणावतने रसायनशास्त्र विषयात इंटरमध्ये नापास झाल्यानंतर औपचारिक शिक्षणाला रामराम ठोकला. गांधीजींनी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथून बॅरिस्टर पदवी प्राप्त केली होती.
धर्मसंसद हा वादग्रस्त विधानांचा मंच बनविला जात आहे, हे सर्वाधिक दुःखद आहे. म्हणूनच हरिद्वारमधील धर्मसंसदेतील वादग्रस्त विधानांचा वाद शांत होतो ना होतो, तोच रायपूर येथील धर्मसंसदेत कालीचरण महाराज विषारी गरळ ओकताना दिसतात. या महाराजांनी महात्मा गांधींविषयी असंसदीय भाषा वापरली तर नथुराम गोडसेची तारीफ केली. सर्वांत विचित्र गोष्ट अशी की, कालीचरण महाराजांच्या या वक्तव्यांना धर्मसंसदेत टाळ्या मिळाल्या. कोण आहे कालीचरण? हा प्रश्न या घटनेनंतर सर्वांनाच पडला. संन्यास घेण्यापूर्वीचे त्यांचे नाव अभिजित सारंग असे आहे. महाराष्ट्रातील अकोला येथील ते रहिवासी आहेत.
अकोल्याच्या शिवाजीनगरमध्ये पंच बंगला परिसरात त्यांचे वास्तव्य होते. आपल्याला शाळेत जाण्यात काहीच रस नव्हता, हे त्यांनी स्वतःच जाहीर केलेले आहे. त्यामुळेच त्यांचे औपचारिक शिक्षण केवळ आठवीपर्यंतच होऊ शकले. इंदौरच्या भय्यूजी महाराजांसमवेत त्यांनी काही काळ वास्तव्य केले. भय्यूजी महाराजांनी आत्महत्या केली होती, हे वाचकांना आठवत असेलच.
कालीचरण यांनी 2017 मध्ये अकोला महानगरपालिका निवडणुकीत नशीब आजमावून पाहिले; परंतु त्यांचा पराभव झाला. पंधरा वर्षे वय असताना आपल्याला महर्षि अगस्त्य यांनी दीक्षा दिली, असे ते सांगतात. एवढेच नव्हे तर एका अपघातात पाय जखमी झाल्यानंतर मोडलेले हाड कालीमातेनेच जोडले, असेही ते सांगतात. कालीमातेने आपल्याला दर्शन दिल्याचा दावा करतात. 2020 मध्ये ते एका व्हिडिओत शिवतांडव स्तोत्र म्हणताना आढळले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरच ते चर्चेत आले होते.
गांधीजींवर टिप्पणी करून त्यांनी अधिक
चर्चेत येण्याचा प्रयत्न केला खरा; परंतु असा प्रयत्न करणाऱ्यांना एक गोष्ट माहीत नाही. ती म्हणजे, गांधीजींवर देश-विदेशात 300 पेक्षा जास्त पुस्तके लिहिली गेली आणि प्रकाशितही झाली. महात्मा गांधींचा सन्मान करण्यासाठी जगातील शंभराहून अधिक देशांनी पोस्टाचे तिकीट जारी केले आहे. गांधीजींच्या 150 व्या जयंतीदिनी, 2019 मध्ये फ्रान्स, उजबेकिस्तान, तुर्की, पॅलेस्टाइन यांसह 69 देशांनी टपाल तिकीट जारी केले होते.
महात्मा गांधीजींचे पुतळे केवळ भारतातच नव्हे तर जगातील 70 पेक्षा जास्त देशांमध्ये दिसून येतात. एवढेच नव्हे तर गांधीजींविषयी टिप्पणी करणारे बरेच लोक स्वतःला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित मानतात; परंतु अशा बहुतांश लोकांचा वाचनावर विश्वास नाही. त्यांना गांधीजींविषयी काहीही माहीत नाही आणि त्यांना जाणून घेण्यात रसही नाही. वास्तव असे आहे की, संघ भारताच्या निर्मात्या महापुरुषांपैकी एक म्हणून गांधीजींचा स्वीकार करतो आणि म्हणूनच प्रातःस्मरणात त्यांचे नावही घेतो.
रामकृष्णो दयानंदो रवींद्रो राममोहनः
रामतीर्थो।ऱविंदश्च विवेकानंद उद्यशाः।।
दादाभाई गोपबंधुः तिलको गांधी राहतः
रमणो मालवीयश्च श्री सुब्रमण्य भारती।।
हेडगेवारांनी संघाची स्थापना केली होती, हे तर या मंडळींना ठाऊक असेलच. हेडगेवार हे पूर्वी बंगालमधील क्रांतिकारी आंदोलनांशी संबंधित होते. मध्य प्रदेशात क्रांतिकारकांचे मोठे संमेलन त्यांनी आयोजित केले होते. त्यानंतर गांधीजींच्या असहकार आंदोलनात सामील झाले होते आणि तुरुंगातही गेले होते. जर ते गांधीजींचे विरोधक असते, तर संघाच्या प्रार्थनेत (जिला एकात्मता स्तोत्र म्हटले जाते) गांधीजींचा समावेश झाला नसता. तसेच हेडगेवार असहकार आंदोलनातही सहभागी झाले नसते.
– योगेश मिश्र