संकटे ही नेहमीच एकमेकांना हाकारे घालत येतात असे म्हटले जाते. त्याचा प्रत्यय सध्या करोनाकाळात येत आहे. काही आठवड्यांपूर्वी राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यातच आता तौक्ते चक्रीवादळाने मुंबई आणि कोकणाला जबरदस्त तडाखा दिला. या सर्व पार्श्वभूमीवर हवामान बदलासंदर्भात खूप गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. केवळ निसर्गातला बदल मानून त्याकडे दुर्लक्ष करून परवडणारे किंवा चालणार नाही.
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये सातत्याने निर्माण होत असलेले कमी दाबाचे पट्टे आणि चक्रीवादळे यामुळे देशातील इतर राज्यांसह महाराष्ट्र, गोव्यातील जनजीवनाला, अर्थकारणाला आणि पर्यायाने समाजकारणाला मोठे तडाखे बसत आहेत. अलीकडेच आलेल्या तौक्ते नामक चक्रीवादळाने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि गोवा या चार राज्यांमध्ये झालेली जीवित व वित्तहानी लक्षणीय आहे. निवारा म्हणजेच घर ही मानवाची मूलभूत गरज आहे. मात्र या चक्रीवादळाच्या तुफानामध्ये अनेक जणांच्या घरांचे जे नुकसान झाले आहे ते पहावत नाही.
तौक्ते चक्रीवादळ हे गेल्या दोन दशकांतील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळांपैकी एक मानले गेले आहे. विशेष म्हणजे हे चक्रीवादळ किनारपट्टीपासून दूर होते. यापूर्वी 2007 मध्ये “दोनू’ आणि 2019 मध्ये “क्यार’ नावाचे दोन चक्रीवादळ अरबी समुद्रात निर्माण झाले होते. परंतु ते दोन्ही किनारपट्टीपासून लांबच होते. याप्रमाणे 2017 मध्ये “ओखी’ चक्रीवादळ हे समुद्रातच होते. परंतु त्याच्यामुळे सुमारे 250 जणांचा मृत्यू झाला होता.
क्रीवादळाचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो. जागतिक हवामान संघटनेने म्हटले की, गेल्या वर्षी मे महिन्यात भारत आणि बांगलादेश येथे आलेल्या चक्रीवादळांमुळे सुमारे 50 लाख लोक निर्वासित झाले. त्यामुळे सुमारे 1400 कोटी डॉलर म्हणजेच एक लाख कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.
गेल्या दोन वर्षांतच इतक्या वेगवेगळ्या प्रकारची छोटी-छोटी चक्रीवादळे आली की त्याचा हवामानावर परिणाम झालेला दिसून आला आहे. मुंबईसारखे महानगर जेव्हा चक्रीवादळ किंवा अतिवृष्टीमुळे ठप्प होते तेव्हा एकाच वेळी त्याचा सामाजिक आणि आर्थिक प्रभाव जाणवतो. साधारणपणे भारतात चक्रीवादळ हे मे ते ऑक्टोबर या काळात घोंगावतात.
बहुतांश चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरात येतात आणि त्याचा परिणाम पूर्व किनारपट्टीवर जाणवतो. पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू राज्यात चक्रीवादळाचे नेहमीच संकट असते. 1999 च्या सुपर सायक्लोनशिवाय आइला, पाइलिन, हुदहुद, गज, तितली आणि फानी यासारख्या चक्रीवादळाने गेल्या वीस वर्षांत हाहाकार माजवला.
आजपर्यंत चक्रीवादळांची मालिका आणि चक्रीवादळांचे महाचक्रीवादळात होणारे रूपांतर पाहता ऍम्फी, निवार, गती, निसर्ग आणि बुरेवी या चक्रीवादळांनी गेली 15 महिने धुमाकूळ घातला होता. निसर्ग आणि गती हे अरबी समुद्रात तर इतर तीन चक्रीवादळे ही बंगालच्या उपसागरात तयार झाली होती.
निसर्ग चक्रीवादळाने प्रामुख्याने महाराष्ट्रात हाहाकार उडवून दिला होता. महाराष्ट्रात प्रचंड असे नुकसान केले. सलग चौथ्या वर्षी मॉन्सूनच्या अगोदर अरबी समुद्रात चक्रीवादळ धडकत आहेत आणि ही बाब तौक्ते चक्रीवादळाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. विशेष म्हणजे सलग तिसऱ्या वर्षी चक्रीवादळ हे पश्चिम किनारपट्टीच्या जवळ आले आहे.
गेल्या दहा वर्षांमध्ये वातावरण किंवा पर्यावरणामध्ये विलक्षण स्वरूपाचे बदल झालेले पाहायला मिळताहेत. याचे परिणाम केवळ भारतातच नव्हे तर जगातल्या सर्वच देशांना सोसावे लागत आहेत. आतापर्यंत ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जगामध्ये तापमान वाढत असल्याची चर्चा ऐकू येत होती. पण आता एकूणच हवामानामध्ये प्रचंड उलथापालथ होताना दिसून येते.
भारतासारख्या विकसनशील देशात ही बाब अगदी ठळकपणे नजरेस येते. या सर्व पार्श्वभूमीवर हवामान बदलासंदर्भात खूप गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. केवळ निसर्गातला बदल मानून त्याकडे दुर्लक्ष करून परवडणारे किंवा चालणार नाही. अशा वारंवार होणाऱ्या बदलांचा अभ्यास अधिक आवश्यक ठरतो आहे. त्यातील परिणाम सातत्याने लक्षात घेऊन तशा उपाययोजना कराव्या लागतील आणि त्यासाठी कृतीआराखडे करावे लागतील.
गेल्या काही वर्षांत हवामान बदलांमुळेच अवकाळी पावसाची वारंवारिताही वाढली आहे. त्याला आपण अवकाळी जरी म्हणत असलो तरी न चुकता दर दोन-चार महिन्यांनी येत असल्याने तो नियमितच झाल्याचे दिसत आहे. यामुळे राज्यात शेतमालाचे किंवा शेतीउत्पादनाचे होणारे नुकसान अपरिमित आहे. जून ते सप्टेंबरमधला पाऊस शेतीसाठी चांगला आणि इतर वेळचा पाऊस शेतीसाठी मारक. म्हणून त्याला अवेळी आलेला म्हणतात. त्यातच हा पाऊस म्हणजे नुसते पाणी नव्हे, तर गारांचा मारा. वास्तविक दरवर्षी या सुमारास तो येतोच. फक्त त्याचे प्रमाण कमी-अधिक असते.
हिवाळा संपताना आणि उन्हाळा सुरू होताना अशा प्रकारचा पाऊस हा उत्तर भारत, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात हमखास येतो. त्याचे प्रमाण नैऋत्य मोसमी पावसाच्या तुलनेत अत्यल्प असते, पण यामुळे शेतपिकांचे होणारे नुकसान मात्र जास्त असते. त्यामुळे अवकाळी येणारा हा पाऊस शेतकऱ्यांना नकोसा वाटतो. अशातच विजेचा झटका (शॉक) बसून, अंगावर वीज कोसळून होणारे दुर्दैवी मृत्यू, घरांची मोडतोड, जनावरांना होणारा त्रास अशा अनेक घटना घडत असतात. वृक्ष आणि विजेचे खांब उन्मळून पडतात. शेतकरी राजाने काढून ठेवलेली पिके ही पालापाचोळ्यासारखी उडून जातात.
आज देशाबरोबरच महाराष्ट्र राज्यही अत्यंत मोठ्या संकटांनी ग्रासलेले आहे. संकटाची व्याप्ती आर्थिक पाहणी अहवालाने दाखवून दिली आहे. त्यातच वादळे, अवकाळी पावसाने कृषीक्षेत्राची चिंता वाढलेली आहे. करोनाच्या काळात उद्योगव्यवस्था ठप्प झाली तेव्हा कृषीक्षेत्र एकटेच होते ज्याने जीडीपीला आणि पर्यायाने अर्थचक्राला हातभार दिला. पण आज अस्मानी संकटाने शेतकरी हताश झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी अधिक प्रयत्न आवश्यक आहेत.
वादळीवाऱ्यासह गारपीट झालेल्या विभागात नुकसानीचे पंचनामे प्राधान्याने होणे आणि तात्काळ योग्य नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण होता कामा नये. कर्जमाफीप्रमाणे बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळाल्यास मोडकळीस आलेले संसार ते सावरू शकतील. त्यामुळे केवळ कागदी घोडे न नाचविता हात दिला तरच नुकसानग्रस्त बळीराजाला हिमतीने पुन्हा उभे राहता येईल.
भारतीय हवामान (खात्याच्या) विभागाच्या अंदाजानुसार यंदा मान्सून सामन्य असेल आणि 98 टक्के पर्जन्यमानाची शक्यता आहे. खरेतर जे काही निसर्गाचे ऋतुचक्र आहे ते ठरल्याप्रमाणे फिरत असते. फक्त त्यामध्ये कधी कधी मागे पुढे होते. पावसाळा वेळेवर असणे आणि पुरेसा पाऊस कोसळणे म्हणजेच संपूर्ण वर्षभराची ती आनंदवार्ता म्हणावी लागते. कारण या पुरेशा पावसामुळे संपूर्ण वर्ष सुखासमाधानाने जाण्याची शाश्वती मिळत असते.
करोनामुळे अंधःकारलेल्या या वातावरणात पर्जन्यवृष्टी जर समाधानकारक झाली, तिचे वितरण योग्य प्रकारे झाले तर आशेची पालवी फुटेल. याउलट पावसात खंड पडणे, ढगफुटी होणे, अतिवृष्टी होणे असे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडले तर संकटाचे गहिरेपण वाढेल.
आज करोनामुळे बहुसंख्य ठिकाणचे आठवडे बाजार बंद झाले आहेत. बाजारपेठेत औदासिन्याचे वातावरण आहे. शेतमालाला सध्या उठाव कमी आहे. नगदी पिकाच्या भरोशावर असलेला शेतकरी हताश झाला आहे. चक्रीवादळ, अवकाळी आणि करोनाच्या संकटाचा एकूणच विचार करता शेतकऱ्यांना राज्यासह केंद्राचीही मदत मिळवायला हवी. कारण या संकटांमुळे ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पार ढेपाळली आहे.
कोकणासारखा प्रदेश गेल्या काही वर्षांत वाढत्या पर्यटनामुळे काहीसा सुखावला होता. मात्र गेल्या दीड वर्षांपासून करोनामुळे या क्षेत्रातील पर्यटन व्यवसाय जवळपास बंद आहे. तशातच करोनाकाळात दोन वादळांनी कोकणात धुमाकूळ घातल्याने तेथील जनजीवन चिंताक्रांत झाले आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका दिसू लागल्यानंतर केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा उद्योगांना दिलासा देण्यासाठी काही सवलती दिल्या जातील अशी चर्चा सुरू आहे. त्याच धर्तीवर चक्रीवादळ आणि अवकाळीच्या संकटाने मेटाकुटीला आलेल्या बाधितांना आणि बळीराजालाही मदतीचा हात दिला गेला पाहिजे.
– मोहन एस. मते