आपले आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रश्न आहेत. अशा प्रश्नांकडे कसे बघायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न. अशाच प्रश्नांविषयी प्रश्न…
आपण आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरे जात असतो. असे अनेक प्रश्न सोडविण्यातच आपले आयुष्य निघून जाते. काही व्यक्तींच्या बाबतीत तर आयुष्य संपते; पण प्रश्न सुटत नाहीत, असेही होते. या दुनियेत जेवढी माणसे आहेत तेवढे प्रश्न आहेत. खरे तर बरेच प्रश्न आपण टाळू शकत असणाऱ्या चुकांमधून निर्माण केलेले असतात. बरेच प्रश्न आपल्या बेशिस्त वागण्याने निर्माण केलेले असतात.
बरेच प्रश्न आपल्या नियोजनाच्या अभावाने निर्माण केलेले असतात. वास्तविक पाहता फारच कमी प्रश्न असतात की, जे आपल्यावर लादले गेलेले असतात किंवा दुसऱ्याच्या चुकीने आपल्या आयुष्यात निर्माण झालेले असतात किंवा दुसऱ्याने आपल्याशी कसे वागावे हे आपल्या हातात नसते त्यातून निर्माण झालेले असतात. आणखीनही काही प्रकारांमध्ये आपल्या आयुष्यातील प्रश्नांचे वर्गीकरण करता येईल.
आपण स्वतःहून कोणतेही प्रश्न निर्माण होणार नाहीत याची काळजी जर घेतली तरी आपले आयुष्य बऱ्याच अंशी सुखकर होऊ शकते. पण आपल्यापैकी बरेचजण असे असतात की, जे कोणतेही नियोजन न करता कामास सुरुवात करतात. मग जेव्हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहतो त्यावेळी ते विचार करायला सुरुवात करतात. याही पेक्षा काही व्यक्ती पुढच्या असतात. त्यांना आपल्याला काही प्रश्न आहेत हे माहीतच नसते.
जर त्यांना अशा प्रश्नांबाबत जर विचारले तर ते हसत विचारणाऱ्याला शिकवितात, “अरे एवढा विचार कोण करतंय…’, “अरे एवढी कशाला आपण काळजी करायची?, “शेवटी जे व्हायचे ते होणारच…’, “अरे माझा तो (परमेश्वर) माझ्या पाठीशी असताना मला कशाचीही काळजी नाही.’ असे काही बोलून ते पळ काढतात. “मांजर डोळे झाकून दूध पिते’ तसेच आहे. प्रश्नांकडे जरी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला म्हणजे प्रश्न सुटला असे नाही. प्रश्न जागेवरच आहे. किंबहुना तो वाढतच आहे.
असाच आपला एक मित्र “सुनील’. तो थोडीफार शाळा शिकला. थोडा मोठा झाल्यावर कुठल्यातरी दुकानात कामाला लागला. लगेच त्याने त्याच्या दबलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यास सुरुवात केली. मैत्रिणीला घेऊन सहलीला जाऊ लागला. जास्त किमतीचे भ्रमणध्वनी संच वापरू लागला. घरी आईने बनविलेला स्वयंपाक त्याला बेचव वाटू लागला, म्हणून तो बाहेर तारांकित खानावळीमध्ये रोजच जेवू लागला. हळूच मदिराही प्राशन करू लागला… वगैरे वगैरे आणखी बरेच काही करू लागला. आणखी काही दिवसांनी परवडत नसतानाही चार चाकी गाडी घेतली. एकूणच सुनीलचे चांगले चालू होते. असेच दिवस पुढे सरकत होते. त्याच्या अनेक मैत्रिणींपैकी एकीशी त्याने लग्न केले.
घरी मोठा भाऊ त्याची बायको, बहीण व आई-वडील होते. सगळे एकत्र राहू लागल्याने भावंडांची काही दिवसांनी भांडणे होऊ लागली. तर सुनीलचे खर्च वाढतच होते. शिवाय मित्रांकडून घेतलेले उधार-उसने पैसे, इतर सावकरांकडून घेतलेले कर्ज, त्याचे व्याज वाढतच होते. तर इकडे पगार काही वाढत नव्हता. उलट नोकरीमध्ये जास्तच समस्या निर्माण होऊ लागल्या. एके दिवशी गृह कलहाला वैतागून सुनीलने वेगळ्या घरात राहायला सुरुवात केली. त्या घराचे भाडे सुरू झाले. सुनीलला मुलगाही झाला.
एव्हाना सुनील आता 45 वर्षे वयाचा झाला होता. त्याचा पगार काही वाढत नव्हता. पण सुनीलला मुलाच्या शिक्षणाचा खर्चही सुरू झाला. आता तर त्याला पगार अजिबातच पुरत नव्हता आणि वीस वर्षांपूर्वी जसा तो मनमोकळेपणाने खर्च करू शकत होता तसा आता करू शकत नव्हता. वीस वर्षांपूर्वी त्याच्यावर काहीच कर्ज नव्हते, आता तो पूर्णपणे कर्जात बुडालेला होता. वीस वर्षांपूर्वी त्याच्यावर कोणतीच जबाबदारी नव्हती आता त्याला बायको व मुलाची जबाबदारी होती पण त्याकडे तो दुर्लक्ष करीत होता. मुलाला चांगल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी सुनीलकडे पुरेसे पैसेही नव्हते. तर घर भाडेही वाढत होते. पण पगार मात्र त्यामानाने वाढत नव्हता. तर जीवन विमा, आरोग्य विमा काढायचे असतात हे त्याला माहीतच नव्हते. कारण त्याला काहीच होणार नाही याची खात्री होती.
असा हा सुनील “अरे तू स्वतःचे घर कधी घेणार?’, “अरे तू मुलाला कोणत्या अभ्यासक्रमाला टाकणार?’, “अरे आईच्या शल्यचिकित्सेसाठी तुझ्याकडे किती पैसे आहेत?’, “अरे तू निवृत्ती वेतन योजनेत किती पैसे दर महा टाकतो?’ या आणि अशा कितीतरी प्रश्नांवर तो विचारच करत नव्हता. त्याला आपल्याला काही प्रश्न आहेत याची जाणीवच नाही आणि मी सुखात आहे असे इतरांना भासवत असे. पण “नकळत पद अग्नी वर पडे न करी दाह असे न कधी घडे’ या उक्तीप्रमाणे सुनीलला असणारे प्रश्न त्याच्यावर दुष्परिणाम करतच होते. पण तरीही तो मांजरासारखा डोळे मिटूनच बसला होता.
पण आपण जर आपल्या आयुष्याच्या दृष्टीने फार आधीपासून आपल्या मन मंदिराच्या गाभाऱ्यात बसून विचार व कृती करायला सुरुवात केली असता, एकतर संभाव्य प्रश्न निर्माण होत नाही किंवा निर्माण होणारे संभाव्य प्रश्न सोडविण्यासाठी पूर्व तयारी करता येते. आणि अधिक चांगले आयुष्य जगता येते. बाकी चेहऱ्यावरचे स्नायू हलविले की हसू येतच असते आणि त्यासाठी काही पैसे खर्च करावे लागत नाही. हीच आपल्या मनोदेवतेची खरी आराधना होय. म्हणून नकली हसू आणून आयुष्य जगायचे की खरे हसू आणून जगायचे हा ज्याचा त्याचा “प्रश्न’. आपल्या मनोदेवतेला कोणते पुष्प अर्पण करावयाचे “खरे’ की “खोटे’ हे आपण ठरवायचे. कारण आयुष्यात “प्रश्न’ कधीच संपत नसतात…
अनिकेत भालेराव