पिंपळे गुरव -दापोडी परिसरात भर दुपारी झालेल्या अपघातात अनिकेत शिंदे या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मात्र, येथील परिस्थिती अद्यापही “जैसे थे’ आहे. येथे वाहतूक नियंत्रक दिवे बसवावेत, विद्यार्थ्यांना चालण्यासाठी पदपथ बनवावेत, अशी मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. कोणाचे काय गेले, माझे बाळ मात्र, गेले, असा शब्दात मुलाच्या आईने भावना व्यक्त केल्या असून अता तरी प्रशासनाला जाग येईल का? असा सवाल त्यांनी केला आहे.
मंगळवारी (दि. 15) येथील चौकात झालेल्या अपघातात अनिकेतचा मृत्यू झाला. येथील शिवाजी महाराज पुतळ्यासमोर ही घटना घडली. हा चौक नेहमीच गजबजलेला असतो. त्यामुळे येथील चौक आणि अतिक्रमणांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दापोडी येथे स्वामी विवेकानंद शाळा, कॉलेज व पुढे शाळा आहे. येथे वाहनांची नेहमीच वर्दळ असते.
दापोडी येथ पाटबंधारे विभाग, एसटी वर्कशॉप आहे. त्यामुळे येथे कायमच वर्दळ असते. येथील रस्ते लहान असून अवजड वाहनांना परवागनी नको. येथे नियोजनाचा अभाव आहे. या रस्त्यावरून अवजड वाहने भरधाव वेगाने जातात. येथे वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जात नाही, असे मैत्री ग्रुपचे रवी कांबळे यांनी सांगितले.