भारताच्या 19 वर्षांखालील युवा क्रिकेट संघाने आयसीसीच्या 19 वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे विक्रमी पाचवे विजेतेपद पटकावले. विश्वविजयाची पंचमी साकार केली असली तरीही आता काही दिवसांतच हा कौतुक सोहळा मागे पडेल व या संघातील सगळ्यांच्या डोक्यावर आणखी सरस कामगिरीच्या अपेक्षांचा काटेरी मुकुट आलेला दिसेल.
खरेतर या वयोगटात भारतीय संघाचे वर्चस्व यंदाही आबाधित राहिले. 2000, 2008, 2012, 2018 व यंदा अशी पाचवेळा आपल्या संघाने ही स्पर्धा जिंकली. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासूनच भारतीय संघाने आपल्याला संभाव्य विजेता का म्हटले जाते याची साक्ष दिली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विजयी सलामी देत अंतिम सामन्यापर्यंत संघाने सातत्याने सरस खेळ केला. ही स्पर्धा कॅरेबियन बेटांवर आयोजित केली होती, त्यामुळे स्पर्धेवर पावसाचे सावट तर होतेच पण त्याहीपेक्षा मोठा धोका होता, तो करोना संसर्गाचा. स्पर्धेला प्रारंभ झाल्यावर दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत आगेकूच करत असलेल्या संघात ज्याची भीती होती त्या करोनाने एन्ट्री केलीच.
नियमित कर्णधार यश धुल, शेख रशीद यांच्यासह संघातील पाच खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफमधील अन्य काही जण करोनाबाधित असल्याचे समोर आले व भारतीय संघाला तसेच त्यांच्या विजेतेपदाच्या संधीला मोठा धक्का बसला. मात्र, याही परिस्थितीतून सावरून जबरदस्त खेळ करत भारताच्या या युवकांनी जिद्दी खेळाने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. उपांत्य सामन्यापासून नियमित कर्णधार यश धुलसह सर्व मोहरे संघात परतले व भक्कमपणे प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाला आस्मान दाखवत करंडक मायदेशी आणला. त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. मात्र, आता या खेळाडूंवरची जबाबदारी कितीतरी पटीने वाढणार आहे. ही एक स्पर्धा नसून प्रमुख भारतीय संघात एन्ट्री करण्याची पहिली पायरी आहे.
विराट कोहलीने 2008 साली याच पायरीवर यश मिळवून भारताच्या राष्ट्रीय संघात प्रवेश केला व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या कामगिरीचा वारसदार अशी ख्याती मिळवली. यंदाच्या युवा स्पर्धेतील सर्व खेळाडूंची कामगिरी पाहिली तर रोहित शर्मा, कोहली, शिखर धवन, लोकेश राहुल व ऋषभ पंत यांना पर्याय मिळतील असा विश्वास वाटतो. त्यांनी त्यांची जबाबदारी ओळखून खेळ केला व स्वप्नवत कामगिरी केली मात्र, आता त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा प्रचंड वाढणार आहेत. युवा संघ व प्रमुख संघ यांत ऑर्केस्ट्रातील गायन व प्रत्यक्ष चित्रपटासाठी केलेले गायन इतका मोठा फरक आहे.
पुणेकराचेही योगदान
ऋषिकेश कानिटकर या महाराष्ट्राच्या माजी रणजी कर्णधाराला संघाचा मुख्य प्रशिक्षक बनवले गेले होते. त्याच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रानेच नव्हे तर राजस्थाननेही रणजी करंडक स्पर्धेत अफलातून कामगिरी केली होती. महाराष्ट्राला त्याच्या नेतृत्वात करंडक जरी जिंकता आला नसला तरीही त्याने आपल्या प्रशिक्षणाखाली राजस्थानला विजेते बनवले होते. तोच त्याचा अनुभव बीसीसीआयने महत्त्वाचा मानला व त्याला युवा संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त केले. त्यानेही आपले काम चोख बजावले व संघाच्या विश्वविजयात मोलाचा वाटाही उचलला.
द्रविडच्या शिकवणुकीमुळे यश
भारतीय संघाचे माजी कर्णधार व सध्याच्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड जेव्हा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक होते तेव्हा हाच युवा संघ त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत होता. थेट द्रविड यांनी प्रत्येकाला क्रिकेटचे धडे दिले नसले तरीही द्रविड गुरुजींची शिकवण या संघाला मोठी लाभदायक ठरली. म्हणूनच द्रविडचे महत्त्व पटते. त्यांनी निवृत्ती घेतल्यावर लगेचच प्रशिक्षकपदाचा प्रस्ताव स्वीकारला नाही तर अकादमीच्या संचालकपदी काम करण्यास पसंती दाखवली.
हेच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचेही यश म्हणावे लागेल. कारण गांगुली यांच्या नेतृत्वात द्रविड खेळलाही होता व द्रविडचे बलस्थान काय आहे हे नेमके ओळखून त्यालाच अकादमीत युवा खेळाडूंना घडवण्याचे म्हणजेच हिरा शोधण्याचे रत्नपारख्याचे काम देण्यात आले. सध्याच्या संघातील इशान किशन पासून, पृथ्वी शॉ सह आताच्या युवा संघातील जवळपास सर्वच खेळाडूंना द्रविड सरांच्याच शिकवणुकीमुळे यश मिळाले हे देखील कोणीच नाकारणार नाही.
करोनावरही जिद्दीने मात
कर्णधार यश धुलसह अनेक खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफ करोनाबाधित असल्याचे आढळल्यावर आपल्या विश्वकरंडक मोहिमेला धक्का बसणार असेच चित्र निर्माण झाले होते. मात्र, या खेळाडूंनी अत्यंत जिद्दीने व मानसिक सकारात्मकतेने मात केली व संघात पुनरागमन करत एकेका सामन्यात आपल्या खेळाचा दर्जा उंचावला. करोना झालेल्या अन्य व्यक्तींना यातून बरे होऊन लगेचच कार्यरत होणे जिकिरीचे बनते मात्र, हा समज आल्या अफलातून तंदुरुस्तीद्वारे युवा खेळाडूंनी दूर केला. विलगीकरणात खालावणारी मानसिकताही त्यांनी जवळपासही फिरकू दिली नाही. तंदुरुस्तीचा कस पाहणारा करोनाही या खेळाडूंच्या जिद्दीसमोर पराभूत झाला तिथे ऑस्ट्रेलिया व इंग्लंड संघाची काय कथा.
मालामाल विकली
युवा संघाच्या या यशासाठी बीसीसीआयसह सर्व पदाधिकारी व आजी माजी खेळाडू यांनी खेळाडूंचे कौतुक केले. त्याचबरोबर बीसीसीआयने या विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी 40 लाख रुपयांचे बक्षिसही जाहीर केले. केवळ हे त्यांचेच यश आहे असे नव्हे तर सपोर्ट स्टाफचेही या विजयात मोलाचे योगदान आहे असे मत व्यक्त करत त्यांनाही प्रत्येकी 25 लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार असल्याचे सांगितले. या विजेतेपदाने येत्या काळात याच खेळाडूंना मोठी ब्रॅंडव्हॅल्यू मिळणार आहे. आता त्यांच्याकडे पत, प्रतिष्ठा, मान, सन्मान यांच्यासह पैशांचाही ओघ सुरू होणार आहे.
कधीकाळी 1983 सालच्या विश्वविजेत्या भारतीय संघाला बक्षिस देण्यासाठी बीसीसीआयकडे पैसा नव्हता आज तेच बीसीसीआय लाखो रुपयांची उधळण मुक्तहस्ते करत आहे ते यासारख्यांच कित्येक खेळाडूंच्या यशस्वी कामगिरीमुळे. 1983 सालच्या हिरोंनी क्रिकेटमध्ये पैसा आहे हे दाखवले तर आजच्या युवा संघाने क्रिकेटचे मार्केटिंग कसे केले जाते हे सिद्ध केले. एकेकाळी करोडोंच्या लोकसंख्येमुळे आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो असे म्हटले जायचे, आता हीच लोकसंख्या ब्रॅंड प्रमोशनची ताकद ठरत आहे.
आता या खेळाडूंना नवनवे करार मिळतील, प्रायोजकताही मिळेल. स्टार उदयाला आलेले दिसतील परंतु याच अपेक्षांचा काटेरी मुकुटही आता या खेळाडूंना धारण करावा लागेल. असो, आता युवा संघाच्या या यशाचे कौतुक सुरू झाले असून सध्यातरी याच आनंदात त्यांची वाटचाल होत राहील. मात्र, येणारा काळ त्यांच्यासाठी अपेक्षांचे दडपण वाढवणारा ठरणार आहे व हेच दडपण योग्यपणे हाताळत यातूनच देशाला नवा सचिन, गांगुली, धोनी, सेहवाग, युवराज, कोहली व रोहित मिळावा हीच अपेक्षा आहे.
धुलच्या नेतृत्वाला सलाम
युवा संघाच्या कर्णधारपदी यश धुलची नियुक्ती झाली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, त्याने ज्या पद्धतीने प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाचे कमकुवत दुवे हेरले व त्यानुसार आपल्या संघाच्या क्षमतेचा व मर्यादेचा हिशेब लावून खेळ करून घेतला त्याला तोड नाही. या संघाला सल्लागार म्हणून उपस्थित असलेले माजी कसोटीपटू व राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण यांनीही धुलच्या याच गुणांचे जास्त कौतुक केले. एखाद्या अनुभवी कर्णधारालाही जमले नसते ते धुलने करून दाखवले. समोरचा संघ दक्षिण आफ्रिकेचा, ऑस्ट्रेलियाचा असो की इंग्लंडचा त्याने तयार केलेली रणनीती प्रचंड यशस्वी ठरली.
इंग्लंडचे फलंदाज स्विंग गोलंदाजीसमोर नांगी टाकतात हे त्याने त्यांच्या पहिल्याच सामन्यात हेरले व संघातील राजवर्धन हंगरगेकर, रवी कुमार, राज बावा, विकी ओस्तवाल, निशांत सिंधू व कौशल तांबे या उपलब्ध गोलंदाजांचा अत्यंत खुबीने वापर केला. या स्पर्धेतून रवी कुमार, हंगरगेकर व बावा हे तीन समर्थ गोलंदाज पुढील काळात भारताच्या प्रमुख संघाचे आधारस्तंभ बनतील असा विश्वास वाटतो. फलंदाजी पाहिली तर अंगक्रीष रघुवंशी, हरनूर सिंग यांचे सातत्य थोडे कमी पडले. मात्र, कर्णधार धुल, राज बावा, दीनेश बाना, शेख रशीद व निशांत सिंधू यांनी अत्यंत दडपणाखाली अफलातून फलंदाजी करत धवन, राहुल यांना भविष्यातील स्थान टीकवण्यासाठी धोका आहे हाच इशारा दिला.
अमित डोंगरे