मंचर -मावळ तालुक्यातील बैलगाडा शर्यत आटपुन घरी माघारी परतताना लोणी (ता. आंबेगाव) येथे पिकअपचा टायर फुटून पिकअप उलटल्याने झालेल्या अपघातात बैलगाडाप्रेमी युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 11) रात्री घडली. अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात फरार पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आकाश राजू लोणकर (वय 30 रा. शिरापूर, ता. पारनेर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर दत्ता अशोक चाटे (वय 40 रा. शिरापूर ता. पारनेर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पिकअप चालकाचे नाव आहे. तर रवींद्र काशिनाथ माळी (वय 29 रा. चोंबुत, ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे.
लोणी गावाच्या हद्दीतील पाबळ ते लोणी रस्त्यावर हॉटेल परंपरा समोर दत्ता चाटे हे त्यांच्या पिकअप मधून रवींद्र माळी यांच्यासह चोंबुत येथे निघाले होते. पिकअप चालकाने गाडी भरधाव वेगात चालवून लोणीकडे जात असताना पिकअपचा पाठीमागील टायर फुटल्याने गाडी उलटून अपघात झाला.अपघतात रवींद्र माळी, रोशन माळी, लखण माळी तसेच पिकअपमधील इतर व्यक्तींच्या किरकोळ व गंभीर दुखापत झाली, तर आकाश यांचा मृत्यू झाला. तर पिकअपचालक चाटे हा अपघातानंतर गाडी घेवून पळून गेला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जवान संजय नाडेकर करीत आहे. दरम्यान, अपघातातील जखमींची मंचर येथील खासगी दवाखान्यात वैद्यकीय उपचार सुरू असताना शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भेट देवून विचारपूस केली.