एक मे महाराष्ट्र दिन म्हणजेच कामगार दिन! भाषिक राज्यासाठी महाराष्ट्राला फार मोठा लढा द्यावा लागला. तेरा भाषिक राज्यं झाली; पण महाराष्ट्राला मात्र न्याय मिळाला नाही. म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठे रामायण महाभारत घडले. 106 हुतात्मे झाले. अश्रूधूर, गोळीबार, गोळी घाला! मारण्यासाठीच गोळी घाला! अशा प्रकारच्या ऑर्डर्स दिल्या होत्या. मराठी लोकांवर अत्याचार केले होते. मराठी माणसावर आरोप केले गेले होते.
संयुक्त महाराष्ट्र समितीने निदर्शने, जाहीर सभा, चार मोठे जबरदस्त मोर्चे काढले. पहिला जुलै 1956 ला दिल्लीवर मोर्चा. नोव्हेंबरमध्ये दुसरा दिल्लीवर मोर्चा. तिसरा 30 नोव्हेंबर रोजी प्रतापगडावर मोर्चा आणि शेवटचा सीमावासीयांसाठी साराबंदी चळवळ आंदोलन. सतत पाच वर्षे महाराष्ट्रात रात्रंदिवस युद्ध प्रसंग! केंद्र सरकार महाराष्ट्राच्या निर्णयावर कोलांटउड्या मारत होते. त्रिराज्य योजना, विदर्भ वगळून महाराष्ट्र, मुंबई स्वतंत्र, मुंबई केंद्रशासित, महाराष्ट्र, गुजरात विदर्भ वगळून द्विभाषिक, राष्ट्रपती राजवट, गुजरात, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई प्रांत अशा निरनिराळ्या योजना पुढे करून, अनेक समस्या, अनेक अडथळे, अनेक आघात करून वर आम्ही कसे लोकशाहीवादी आहोत, असा दिखावा आणि अनेक दिवास्वप्ने दाखवून मराठी जनतेला झुलवत, बनवत, गाजरे दाखवत महाराष्ट्र समितीला नामोहरम करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात होता. असे नाना पर्याय करून याबाबत खेळ चालवलेला होता. या सगळ्यांना पुरून महाराष्ट्रात मराठी जनतेने प्रचंड मोठा लढा दिला.
जातिभेद, वंशभेद विसरून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अभंग एकजुट, अभेद्य एकजूट आणि जणू काही वज्रमूठ झाली होती. मध्यवर्ती सरकारला या बाबतीत शेवटी नामोहरम केलं आणि 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचे जाहीर केले. तरीदेखील बेळगाव, कारवार, खानापूर, निपाणी अशी 1165 गावे कर्नाटकाच्या घशात घालून दादरा, नगर हवेली, दिव दमण केंद्र शासित करून, त्याचप्रमाणे डाग, उंबरगाव गुजरातला देऊन टाकले. मध्य प्रदेशातील बैतूल, बस्तर, छिंदवाडा मराठी प्रदेश मध्य प्रदेशामध्ये कोंबला अशा रीतीने महाराष्ट्राची लांडगेतोड करून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला.
30 एप्रिल 1960 रोजी रात्री गिरगाव चौपाटीपासून ते हुतात्मा चौकापर्यंत मशाल मोर्चा निघाला. कारण पहिला गोळीबार 22 नोव्हेंबर रोजी येथे झाला होता. गिरगाव चौपाटीवर सीताराम घाडीगावकर, अनंत गोलाकार हुतात्मे झाले म्हणून गिरगाव चौपाटीवरून मशाल मोर्चाची सुरुवात केली आणि शेवट फ्लोरा फाउंटन येथे करण्यात आला. कारण सर्वात जास्त 78-80 हुतात्मे मारून फ्लोरा फाउंटनला अमानुष गोळीबार करून नरसंहार केला होता तसेच मराठी जनतेवर सूड उगवला. शिवाय फ्लोरा फाउंटनपासून सेनापती बापट आणि आचार्य अत्रे यांच्या नेतृत्वाखाली 22 नोव्हेंबर 1956 ला निघालेल्या मोर्चातील 14 माणसे पोलिसांनी मारली. गिरगाव चौपाटीवर निषेध सभा आचार्य अत्रे यांनी सेनापती बापट यांच्या अध्यक्षतेखाली घेतली होती. त्या सभेमध्ये एसएम जोशी यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीचे “संयुक्त महाराष्ट्र निर्माण’ झाल्याने कार्य संपलेले आहे. आता आपला संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह निर्माण झाला आहे. त्याचा आनंद साजरा करूया, असे म्हणाले.
आचार्य अत्रे म्हणाले, आपण सारख्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे! अशा वारंवार घोषणा देत आलो आहोत. आपण “झालाच पाहिजे’, असं म्हणत होतो. आता मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला आहे.त्यामुळे आता आपल्यावर जबाबदारी खूप मोठी पडलेली आहे. महाराष्ट्रातील कल्याणकारी योजना याकडे आपण लक्ष द्यायला हवे. महाराष्ट्रातील गोरगरिबांना-सर्वसाधारण जनतेला त्यांचा विकास होईल, त्यांना चांगले दिवस येतील, असे आपण आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे आता समिती बरखास्त करण्याचा विचारसुद्धा करू नये. तो मराठी जनतेचा विश्वासघात ठरेल. आता कुठे पंडित जवाहरलाल नेहरू संयुक्त महाराष्ट्र द्यायला तयार झालेले आहेत. उद्या शिवाजी पार्कवर सरकारी घोषणा होणार आहे. आता कुठे महाराष्ट्र अवतीर्ण होत आहे. अशा परिस्थितीमध्ये समितीचे कार्य संपलं, असं म्हणण उचित नाही.
दुसऱ्या दिवशी शिवाजी पार्कवर पंडित जवाहरलाल नेहरू भारताच्या नकाशावर महाराष्ट्राचा नकाशा विजेची कळ दाबून, महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यात आला आहे, अशा प्रकारची घोषणा केली. दत्त मंगेशकर भगिनींनी “बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा’ हे पितामह श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे महाराष्ट्र गीत गाऊन मंगलमय वातावरण निर्माण केले. पानिपतच्या मोठ्या पराभवानंतर फार मोठा विजय मराठी जनतेने मिळवला होता. तो साजरा केला!
– ऍड. बाबुराव कानडे