सोरतापवाडी – पुणे-सोलापूर महामार्गावरील नायगाव चौकात सतत वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे नायगाव, तरडे, म्हातोबाची आळंदी येथे जाण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे याठिकाणी वाहतूक पोलीस नोमण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
हवेली तालुका ग्राहक पंचाईतचे अध्यक्ष संदीप शिवरकर यांनी सांगितले की, महामार्गावरील वाहतुकीने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच नायगाव चौकातुन तरडे याठिकाणी असणाऱ्या बीपीसीएल पेट्रोलियम कंपनीकडे जाणाऱ्या टॅंकरमुळे व जड वाहनामुळे नायगाव चौकात दिवसातुन अनेकवेळा वाहतूककोंडी होत आहे. तसेच याठिकाणी अनेक अपघात झालेले आहेत. याबाबत बीपीसीएल पेट्रोलियम कंपनीशी पत्रव्यवहार करत टॅंकरमुळे होणारे दुष्परिणाम संबंधित बीपीसीएल कंपनीचे वाहतूक व्यवस्थापक रितेश जाधव यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे.
यावेळी जाधव यांनी सांगितले की, मागील काही दिवस आमच्या कंपनीमध्ये येणाऱ्या वाहनांपैकी काही गाड्या कंपनीने ठरवून दिलेल्या मार्गाने येत नाहीत ही अतिशय चुकीची बाब आहे. संबंधित चालक आपल्या वाहनांचे इंधन वाचावे किंवा इतर काही कारणास्तव या मार्गाचा अवलंब करीत आहेत. या सर्व चालकांना ठरवून दिलेल्या मार्गाचे भाडे कंपनी देत असते. ठरवून दिलेल्या मार्गाने गाड्या आल्या नाहीत तर पुढील तीन महिन्यासाठी त्या टॅंकरवर निलंबनाची कार्यवाही आम्ही करणार आहोत. यावेळी माजी उपसरपंच तेजस शिवरकर, शिवसेना हवेली तालुका सल्लागार माऊली माथेफोड, ग्रामपंचायत सदस्य विनायक जवळकर, महेश शिवरकर आदी उपस्थित होते.