भर समुद्रात एका आलिशान क्रूझ जहाजावर रेव्ह पार्टीत रंगलेल्या लोकांना झालेली अटक खळबळजनक ठरते, याचे एक कारण म्हणजे बॉलीवूडमधील अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचाही अटक झालेल्यांमध्ये समावेश आहे. देशात अमली पदार्थांचा अवैध व्यापार सुमारे 15 लाख कोटींच्या आसपास असण्याची शक्यता वर्तविण्यात येते. ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे. यामुळे कार्यक्षमतेत घट आणि गुन्हेगारीत वाढ होत आहे.
महानगरात असलेल्या फार्महाऊसमध्ये किंवा आलिशान बंगल्यांमध्ये रेव्ह पार्ट्या होणे ही काही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. अशा असंख्य रेव्ह पार्ट्यांचा भंडाफोड यापूर्वी झालेला आहे. परंतु भर समुद्रात एका आलिशान क्रूझ जहाजावर रेव्ह पार्टीत रंगलेल्या लोकांना झालेली अटक खळबळजनक ठरते. याचे एक कारण म्हणजे बॉलीवूडमधील अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचाही अटक झालेल्यांमध्ये समावेश आहे.
दिल्लीतील तीन मुलींनाही पकडण्यात आले आहे. क्रूझवर चाललेल्या रेव्ह पार्टीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (एनसीबी) अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात हशीश, कोकीन आणि एमडी असे अमली पदार्थ आढळून आले आहेत. बॉलीवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्रींना अमली पदार्थांची चटक लागल्याचे निष्पन्न करणारे अनेक व्हिडिओ यापूर्वीच समोर आले आहेत.
बॉलीवूडमधील प्रमुख अभिनेत्यांच्या मुलांचाही अशा पार्ट्यांमध्ये सहभाग असतो हेही उघड करणाऱ्या बातम्या अनेकदा ऐकायला मिळत असतातच.
यापूर्वी सीमावर्ती राज्य असलेल्या पंजाबला “उडता पंजाब’ ही उपाधी देण्यात आली होती; परंतु अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाने जी वळणे घेतली ती पाहता मुंबईच “उडती महानगरी’ वाटू लागली आहे. अमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या अनेक जणांना (ड्रग पेडलर) पकडण्यात आले आहे. अनेक नामवंत अभिनेते आणि अभिनेत्रींची नावे या बाबतीत समोर आली आहेत.
चित्रपट उद्योगात यामुळे खळबळ उडाली आहे. ज्यांना चित्रपटात पाहून लोक आपला “आदर्श’ मानतात, त्यांचे खरे चेहरे समोर आले. क्रूझवरील रेव्ह पार्टीचा एक वेगळाच रोमांच असतो. 2 ते 4 ऑक्टोबरदरम्यान लोकांना सहलीसाठी नेण्यात आले होते आणि त्यासाठी प्रतिव्यक्ती 80 हजार रुपये तिकीट ठेवण्यात आले होते. तीन दिवसांनंतर या लोकांना पुन्हा मुंबईत पोहोचविले जाणार होते.
एनसीबीची कारवाई हे एक मोठे यश तर आहेच; परंतु मुख्य मुद्दा असा की, मुंबईत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा पुरवठा आजही सुरूच आहे. क्रूझवरील कारवाईच्या एकच दिवस आधी एनसीबीने गादीत लपवून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला अमली पदार्थ पाठविणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला होता आणि पाच कोटी रुपये किमतीचा इफीड्रिन हा अमली पदार्थ जप्त केला होता. गाद्यांचे पार्सल हैदराबादहून आले होते. गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानातून तस्करी करून भारतात आणण्यात आलेले सुमारे तीन टन हेरॉइन गुजरातच्या मुंद्रा बंदरावर जप्त करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉइनची किंमत तब्बल 20 हजार कोटी रुपये इतकी आहे. हे हेरॉइन दोन कंटेनरमध्ये ठेवल्याचे आढळून आले होते.
“नशे की गुडिया, करोडों की पुडिया’ हा खेळ मुंबईत बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. एनसीबीने अमली पदार्थांच्या व्यवसायातील “डॉन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही महिलांनाही अटक केली आहे. या महिलांनी या व्यवसायावर कोट्यवधींचा बॅंक बॅलन्स आणि अन्य संपत्ती निर्माण केली आहे. परंतु केवळ दिखावा म्हणून या महिला गुजरातमधील झोपडपट्टीत राहत होत्या. अमली पदार्थांविरुद्ध कारवायांचा सपाटा सुरू आहे; परंतु तरीही तस्कर सक्रियच आहेत. त्यांचे नेटवर्क एवढे मोठे आहे की, ते पूर्णपणे भेदणे अवघड होऊन बसले आहे.
भारतातील तरुण पिढीच्या नसांमध्ये अमली पदार्थांचे विष पसरविले जात आहे. युवा पिढी नशेच्या आहारी जाऊन आयुष्य बरबाद करून घेत आहे. अनेक राज्ये अमली पदार्थांच्या समस्येने ग्रासलेली आहेत. हिमाचल, उत्तराखंडपासून ईशान्येकडील राज्यांपर्यंत अमली पदार्थांचे नेटवर्क पसरलेले आहे. अफीमच्या दोन प्रमुख उत्पादक देशांच्या मध्ये भारत आहे. एकीकडे भारताच्या एका बाजूला “गोल्डन क्रीसेंट’ म्हणजेच इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे देश आहेत तर दुसरीकडे “गोल्डन ट्रॅंगल’ म्हणजेच आग्नेय आशिया आहे.
भारताच्या या दोन्ही सीमा अमली पदार्थांच्या तस्करीच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहेत. अफगाणिस्तानात तालिबान सरकार आल्यानंतर तस्करी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भारत हा युवकांचा देश आहे. युवकांच्या बळावरच भारत जगातील आर्थिक महासत्ता बनू शकतो, असे म्हटले जात आहे. परंतु ज्या युवा पिढीच्या बळावर भारत आगेकूच करण्याची स्वप्ने पाहतो आहे, ती पिढीच दुर्दैवाने नशेच्या आहारी चालली आहे. नशेबाजी ही एखाद्या राज्यापुरती मर्यादित समस्या नाही. पंजाब, महाराष्ट्र, हरियाणा, मणिपूर, मिझोराम, दिल्ली, बिहार, केरळ आदी राज्यांमध्ये अमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढत आहे.
देशात अमली पदार्थांचा अवैध व्यापार सुमारे 15 लाख कोटींच्या आसपास असण्याची शक्यता वर्तविण्यात येते. ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे. आजच्या काळात एखादा पानवाला अमली पदार्थांचा व्यवसाय करताना आढळतो तर दुसरीकडे एखादा आइस्क्रीमवालाही या व्यवसायात गुरफटलेला आढळतो. अशा स्थितीत या अवैध धंद्याला अंकुश लावणे अत्यंत आव्हानात्मक बनले आहे. संबंधित शासकीय यंत्रणांचे भ्रष्ट अधिकारी, तस्कर आणि पेडलर यांची मिलीभगत असेल, तरच नशेचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालू शकतो.
या धंद्यात बेसुमार पैसा आहे आणि त्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाला मोठी कमाई मिळते, हेच वास्तव आहे. छोटे मासे पकडले जातात; पण मोठे मासे समुद्रात आरामात पोहत राहतात. एकीकडे अमली पदार्थांमुळे कुटुंबात बेबनाव आणि सामाजिक वीण विस्कटण्याचा धोका निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे यामुळे माणसांच्या कार्यक्षमतेत घट होत आहे. यामुळे गुन्हेगारीही वाढत आहे.
एखाद्या चित्रपट अभिनेत्याचा मुलगा या प्रकरणात पकडला गेला, हा मुख्य विषय नाहीच. मुख्य विषय हा आहे की, नशेच्या आहारी जात असलेल्या युवा पिढीची मानसिकता कशी बदलायची? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे काम पालकांचे आहे तसेच समाजाचेही आहे.
– ऍड. प्रदीप उमाप