अगदी सकाळी गावाच्या फाट्यावर लक्झरी बसमधून उतरलो. समोरच रिक्षा होती. तडक गावाच्या दिशेने जायला सुरुवात केली. तळकोकणातील खाडीकिनारी असलेलं छोटसं बोरगाव. मुख्य महामार्गपासून पाच-सहा किलोमीटर दूर. आता गावात जायला रिक्षा वगैरे, ग्रामपंचायतीने दिवाबत्तीची सोय केलेली, गाव बदलत चाललेले आहे, अनेक बंगलेवजा घरे तयार झालेली आहेत. काही अजूनही धूळखात पडली आहेत. दहा मिनिटांनंतर मी घरासमोर पोहोचलो. प्रथम काकांच्या घरी गेलो. तिथे गेल्या गेल्या चुलत भाऊ वहिनीनं स्वागत केलं. गरम गरम चहा घेतला. घरात लगबग चालू होती. कारण संध्याकाळी चुलत पुतणीचा साखरपुडा होता आणि तेवढ्यासाठीच मी खास मुंबईहून आलो होतो. एकटाच रात्री निघालो होतो व सकाळी पोहोचलो.
भावाने समोरच माझ्या घराचा दरवाजा उघडून दिला. तिथे पूर्वी मूळ एकत्र कुटुंब असलेलं घर होतं. आता हे घर कायम बंद असते. पण आता मी येणार व साखरपुड्याचा निमित्ताने पै-पाहुणे येतील म्हणून घर चांगलं साफ होतं. अंघोळ करण्यासाठी घरामागील विहिरीवर तडक गेलो. विहिरीवर पंप वगैरे लावून घेतला होता. चिरेबंद विहिरीतील गार गार पाण्याने अंघोळ केल्यावर खूप बरे वाटले. सगळा बसमधला थकवा निघून गेला. मग कपडे बदलून निवांत घराबाहेर बसलो. बाहेर बघत होतो. साखरपुड्याची थोडी तयारी चालू होती.
समोर दूरवर नदीचे पाणी दिसले. म्हणजे उन्हाळा असल्या कारणाने तसे नदीला तसे पाणी नसतेच; पण खाडी असल्यामुळे भरतीचे पाणी आत येत असते.
क्षणात मन बालपणात निघून गेले. वडील मिलमध्ये असल्यामुळे माझे चौथी नंतर मुंबईत येणे झाले. पण तोपर्यंत गावात मनमुराद रमल्यामुळे गावाची इत्यंभूत माहिती होती. घराच्या बाजूला आंबा, फणस, काजूची झाडे पुढे खाडीजवळ नारळ पोफळीची झाडे. घर व शेती सभोवार जांभ्या दगडाचा गडगा (कुंपण). पावसातील ते शाळेत जाणे, गळक्याच्या शाळेत पाऊस पडणे सर्व अनुभवलेले आहे. गणपतीची धमाल सर्व घराघरातून आरती म्हणण्यास जाणे. मुंबईहून येणाऱ्या पाहुण्यांनी आणलेला खाऊ, शेव खारी बिस्किटे आठवू लागली. दिवाळीची मजा. अगदी वसुबारसेपासून भाऊबीजेपर्यंत अशी मजा. सर्व दिवस खाडकन समोरून गेले. दिवाळीनंतर थेट मोठा सण म्हणजे शिमगा. त्या वेळी सर्व चाकरमानी गावी येत असत. ते खेळे.
उन्हाळ्यात आंबे, फणस, काजू,करवंदे, जांभळे यांचा मेवा व रातांब्याचे अमृत कोकम. मग पाचवीनंतर शाळा मुंबईत असल्याने फक्त होळी, मे महिना व गणपतीलाच जाणे होई. पण या सुट्टीत चाकरमान्यांची पोरं गावात आल्याने आम्हाला खूप भाव असे. कारण मुंबईतून आणलेली छोटी छोटी खेळणी, कपडे, काही इलक्ट्रिक वस्तू आणि खाऊ हे बघण्याला गाव आमच्या घराकडे येत असे. हळूहळू गावाकडे येणंही कमी झाले. नंतर नोकरीनिमित्ताने अगदीच कमी. मे महिन्याच्या सुट्टीत अलीकडे दोन-चार दिवस येतो. जाताना आंबे, फणस, काजू, रातांबे घेऊन जातो. दिवाळीचे दोन-तीनच दिवस येऊन जातो. भात, नारळ, आंबा, फणस, काजू वैगरे यातून मिळणाऱ्या थोड्या फार पैशातील फूल न फूलाची पाकळी ते मला देतात.
संध्याकाळी साखरपुडा साधेपणाने साजरा झाला. लोक पटापट जेवून आपल्या घराकडे व गावाकडे जायला निघाले. मलाही रातराणी दहा वाजताची होतीच. जेवणे आटोपली भावजयनेही एक आंब्याची पेटी व भाजलेले काजूगर दिले. काकांच्या पाया पडून निघणार तेवढ्यात गावातील लाइट गेली व अंधार झाला. लहानपणी अंधाराची खूप भीती वाटत असे कारण आजी वगैरे काही भुताखेतांच्या गोष्टी सांगत असे. मला वाटे की अंधार आला की भूत येऊ शकतो. चुलत भावाने घरात व माझ्या घरात एक कंदील लावला आणि मी बाहेर पडू लागलो. रिक्षा जवळ गेल्यावर मागे वळून पुन्हा एकदा घर पाहिले. गच्च अंधारामुळे अगदी पूर्वीच्या कोकणात जसे वातावरण असे तसे वाटत होते. कंदिलाच्या किलकिल्या अंधारात मला “जिस देश में गंगा बहेती है’ मधील शैलेंद्रजींच्या गाण्याची ओळ आठवली-
लाख लुभाएं महल पराये
अपना घर फिर अपना घर है।
आ अब लौट चलें।
मी जड अंतःकरणाने रिक्षात बसलो.
– उत्तम पिंगळे