मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक जी. ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात आज (10जुलै) रोजी सुरू होत असून, त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा लेख.
मराठी साहित्यातील कथा या प्रकारात अनेक प्रतिभावंतांनी आपल्या लिलया लेखणीतून स्वतंत्र ठसा उमटवून साहित्य गगनात आपलं स्थान अढळ केलं. त्यापैकी एक म्हणजे कथाकार जी. ए. कुलकर्णी. गुरुनाथ आबाजी कुलकर्णी यांचा जन्म कर्नाटकातील चिकोडी तालुक्यातील एकसंबा येथे 10 जुलै 1923 रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण एकसंबा टर माध्यमिक शिक्षण बेळगाव येथे झाले. सन 1939 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर लिंगराज महाविद्यालयातून बी.ए.ची पदवी संपादन केली. त्यानंतर इंग्रजी विषय घेऊन ते एम.ए. झाले. त्यानंतर त्यांनी काही काळ मुंबईत सरकारी नोकरी केली तसेच कारवार येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी केली. त्यानंतर ते धारवाड येथे आले व तेथील जनता महाविद्यालय येथे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
जी.एं. नी 1940 च्या सुमारास कथालेखनाचा श्रीगणेशा केला.त्यांच्या कथा सुरुवातीस चित्रा, विविधवृत्त, धनुर्धारी, सत्यकथा, चित्रमयजगत, मौज, नवयुग, अभिरुची, हंस, मनोहर, वाङ्मयशोभा या मासिकात प्रसिद्ध होत असत. त्यांनी साहित्य क्षेत्रात रूपककथा, प्रतीककथा व गूढ जीवनानुभवाची व थरथरत्या अस्तित्वाच्या संवेदनेची भावचित्रे रेखाटणाऱ्या नव कथा लिहिल्या. मार्च 1955 मध्ये सत्यकथा मासिकाच्या अंकात त्यांची “अंधाराची पावले’ ही कथा प्रसिद्ध झाली.त्यानंतर पडदा, राणी, गुंतवळ, अवशेष, अस्तिस्तोत्र, ऑर्फियस, काकणे, कागदाचा तुकडा, गुलाबाची फुले, चंद्रावळ, जीवन चित्रे, डायरीची कथा, दीक्षा, देवपूजा, नाग, पगाराचा दिवस, पडदा, पत्रिका, प्रवासी (दीर्घकथा), प्रसाद, भिंतीतून जाणारा माणूस, माणूस नावाचं बेट, मुखवटा, यांत्रिक, लिरा, वहाणा, शलॉट, सांगाती, हल्लीच्या मुली, हृदयातील अश्रू, हिरवी मखमल, गोरा हात, क्षुद्र या कथा प्रसिद्ध झाल्या.
“निळासावळा’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह 1959 मध्ये प्रकाशित झाला.त्यानंतर पारवा (1960), हिरवे रावे (1962), रक्तचंदन (1966), काजळमाया (1972), रमलखुणा (1975), सांजशकुन (1975), पिंगळावेळ (1977), डोहकाळिमा (1987) तसेच एक अरबी कहाणी (अनुवादित कादंबरी 1983), गाव (अनुवादित कादंबरी 1967), पैलपाखरे कथासंग्रह (चार अनुवादित दीर्घकथा 1986), रान (1967), हे कथासंग्रह प्रकाशित झाले. 1960 च्या दशकात अमेरिकेच्या माहिती एजन्सीने काही माहिती आणि लिखाण विविध भारतीय भाषांत आणण्याचे ठरवले होते. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून, जी.एं. नी कॉन्राड रिश्टर या अमेरिकी कादंबरीकाराच्या पाच कादंबऱ्यांचा अनुवाद केला. रिश्टरच्या “द फ्री मॅन’ पुस्तकाचा “स्वातंत्र्य आले घरा’ आणि “लाइट इन द फॉरेस्ट’चा “रानातील प्रकाश’ या नावाने त्यांनी अनुवाद केला. तसेच विल्यम गोल्डिंगचे बेस्टसेलर “लॉर्ड ऑफ द फ्लाइज’ आणि “आय सर्व्हाइव्हड हिटलर्स ओव्हेन्स’ ही इंग्रजी लेखिका ओल्गा लेंग्येल यांची मूळ आत्मकथा त्यांनी “वैऱ्याची एक रात्र’ या नावाने अनुवादित केली.
त्यांची राहणी अत्यंत साधी होती. साधा शर्ट-पॅंन्ट व गॉगल सारखा दिसणारा चश्मा असा त्यांचा पोशाख असे. वैयक्तिक आयुष्यात ते अबोल व प्रसिद्धिविन्मुख होते. तत्कालीन साहित्यिक वर्तुळात, कार्यक्रमांत प्रत्यक्ष ऊठबस जाणीवपूर्वक टाळणाऱ्या जी.एं.चा पत्रव्यवहार मात्र दांडगा होता. त्यांनी लिहिलेली पत्रे संपादित करून त्याचे चार खंड “जी.एं.ची निवडक पत्रे’ या नावाने मौज प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या सुनीता देशपांडे, सत्यकथा-मौजचे संपादक श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन, माधव आचवल (जी.एं.चे अंतरंग मित्र), म. द. हातकणंगलेकर, कवी ग्रेस, जयवंत दळवी अशा मित्रांना लिहिलेले ही पत्रे आहेत. या पत्रांमुळे जी.एं.च्या अफाट वाचनाचे, व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंचे मनोज्ञ दर्शन घडते. जीए आणि अनंत व आनंद अंतरकर यांच्यांमधील पत्रव्यवहार “एक धारवाडी कहाणी’ नावाच्या पुस्तकाद्वारे प्रकाशित झाला आहे. त्यांची “राधी’ ही कथा वाचताना त्यांच्या लीलया लेखणीचा उंचावत जाणारा आविष्काराच्या सामर्थ्याचा प्रत्यय येतो. मानवी जीवनातील शोकात्म भान व्यक्त करणारा आशय त्यांच्या कथेत प्रामुख्याने जाणवतो.
माणसाच्या आयुष्यातील शूद्रता व शोकात्मता त्यांनी अगदी धारदार लेखणीतून साकारली आहे. त्यांच्या कथेत घटना, प्रसंग, स्थिती, दृश्य यांचे दुहेरी वर्णन जाणवते. म्हणजे ते एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीशी नकळत संबंध जोडतात. त्यांनी रूपककथा या प्रकाराला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले होते. त्यांनी एकूण 45 रूपककथा लिहिल्या. त्यांच्या “पारवा’ या कथासंग्रहात रूपककथा आढळतात. बखर बिम्मची (1986), मुग्धाची रंगीत गोष्ट (1986), ओंजळधारा (1981),अमृतफळे ही पुस्तके त्यांनी कुमारवयीन वाचकांसाठी लिहिली. “काजळमाया’ या कथासंग्रहासाठी मिळालेला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार, पुढे टीका झाल्यामुळे जी.एं.नी प्रवासखर्चासकट परत केला.
माणसे-अरभाट आणि चिल्लर हे त्याचं आत्मचरित्रपर ललितलेखन असून, त्यांच्या निधनानंतर ते प्रसिद्ध झालं. त्यात ते लिहितात, अत्यंत विशाल असा अश्वस्थ वृक्ष गदागद हलत आहे व क्षणाक्षणाला त्यावरील पाने तुटून वाऱ्यावर येऊन पडत आहेत… माझा देखील कधीतरी अश्वस्थाशी असलेला संबंध तुटेल आणि मातीच्या ओढीने मला खाली यावे लागेल…’ 11 डिसेंबर 1987 रोजी साहित्याच्या अफाट गगनातून जी.ए. हा अढळ असलेला तारा अकस्मात निखळला. त्यांचे पुणे येथे 1985 ते 1987 या काळात वास्तव्य होते.काळाच्या ओघात अनेक साहित्यिक विस्मृतीत चालले असून, जी.ए.कुलकर्णी त्यांच्या कथांद्वारे कायमच स्मरणात राहतील यात शंका नाही. त्यांच्या सारख्या प्रतिभावंत कथाकाराला जन्मशताब्दी निमित्त वंदन.
– अमेय गुप्ते