श्री गणेशाचे स्मरण प्रत्येक शुभकार्याच्या प्रारंभी केले जाते, कारण तो विघ्नहर्ता आहे. गणेश हा गुणांचा अधिपती आहे. कलांची देवता आहे. बुद्धीचे दैवत आहे. अशा या दैवताचा उत्सव साजरा करण्यामागे गणेशाचे गुण श्रद्धेने आणि शुद्ध भावना ठेवून आत्मसात करणे, हेच कारण आहे.
माता-पित्याची पूजा करतो, त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य प्राप्त होते आणि त्याला पृथ्वीवरील सर्व सुखे प्राप्त होतात, अशा अर्थाचा एक संस्कृत श्लोक आहे. श्री गजाननाच्या पृथ्वीप्रदक्षिणेची कथा आपल्याला ठाऊक आहेच. कार्तिकस्वामी पृथ्वीप्रदक्षिणा करून येईपर्यंत श्री गणेशाने आईवडिलांना प्रदक्षिणा घातली आणि तीच पृथ्वीप्रदक्षिणा मानली. गणेशाच्या अनेक पौराणिक कथा आपल्याला अशा प्रकारे मार्गदर्शन करणाऱ्या आहेत.
पार्वतीने गणेशाला द्वारपालाची जबाबदारी सोपविली आणि कशाचीही तमा न बाळगता गणेशाने आपली जबाबदारी पूर्ण केली. प्रसंगी गणेशाने प्राणांचीही पर्वा केली नाही आणि त्याचे फळ म्हणूनच श्री गणेशाला अग्रपूजेचा मान मिळाला. माता-पित्यांच्या आज्ञेचे पालनच मुलांचे सर्वांत प्राथमिक कर्तव्य आहे, ही शिकवण गणेशाकडून आपल्याला मिळते.
श्री गणेश हा बुद्धीचा आणि विद्येचा देव आहे. आपल्याकडे आजही शिक्षणाची सुरुवात श्री गणेशाचे नाव पाटीवर लिहून केली जाते. कोणत्याही कार्याचा प्रारंभ श्री गणेशाच्या स्मरणाने करण्याची प्रथा आहे. इतकेच काय कार्यारंभालाच आपण “श्रीगणेशा’ म्हणतो. श्री गणेशाचे स्मरण करून घेतलेली विद्या सात्त्विक कार्यांसाठी उपयोगात येते, असे आपण मानतो.
धर्मशास्त्रानुसार श्री गणेशाचे स्मरण करून सुरू केलेल्या कार्यात विघ्ने येत नाहीत, तसेच आपल्या सर्व मनोकामनाही पूर्ण होतात.
शास्त्रानुसार गणेशाला अर्पण करण्यात येणाऱ्या गोष्टींमध्ये दुर्वांना विशेष महत्त्व आहे. अथर्वशीर्षात म्हटले आहे की, गणेशाच्या पूजेची सुरुवात जी व्यक्ती दुर्वांकुराने करते, ती कुबेराप्रमाणे संपन्न होते. त्या व्यक्तीच्या घरी धनधान्याची उणीव कधीही जाणवत नाही. गणेशाला प्रिय असलेल्या मोदकाचा नैवेद्य दाखविल्यास व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात, असेही सांगितले गेले आहे. मोदकात ब्रह्म असून त्यातही अमृताचा अंश आहे, अशी मान्यता आहे.
भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून आपण दहा दिवसांचा गणेशोत्सव साजरा करतो. गणेशाचा उत्सव साजरा करण्यामागे गणेशाचे गुण श्रद्धेने आणि शुद्ध भावना ठेवून आत्मसात करणे, हेच कारण आहे. गणेशाचे पूजन म्हणजेच गणेशाचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न होय. मातापित्याच्या आज्ञा शिरसावंद्य मानणे, प्रामाणिकपणे सत्कार्य करीत राहणे, उपलब्ध वस्तूंचा सावधगिरीने वापर करणे, हे गणेशाचे गुण आत्मसात केल्यास व्यापारउदीम तसेच नोकरीव्यवसायात व्यक्ती यशस्वी होते. तसेच क्षेम म्हणजे मिळालेल्या लाभाचे रक्षण करण्याची शक्तीही गणेशाच्या उपासनेमुळे लाभते, असे शास्त्रांत म्हटले आहे.
गणेशाचे गुण आत्मसात करणाऱ्या व्यक्तीची बुद्धी शुद्ध राहते आणि त्यामुळेच ज्ञान, सुख, धन, वैभव, ऐश्वर्य यांची प्राप्ती होते. कार्यारंभी गणेशाचे पूजन करण्यामागेही सद्भावना आणि श्रद्धा याच गोष्टी महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. कोणतेही काम श्रद्धेने केल्यास ते तडीस जाते, अशी भावना त्यामागे आहे. श्री रामचरितमानसात पार्वतीला श्रद्धेचे आणि महादेवाला विश्वासाचे रूप मानले गेले आहे.
हे दोघे गणेशाचे माता-पिता आहेत. अर्थात, श्रद्धा आणि विश्वास यांचा संगम म्हणजे श्री गणेश होय. कोणतेही कार्य करताना शुद्ध भाव आणि प्रामाणिकपणा मनात सातत्याने असावा, यासाठीच गणेशाचे स्मरण करून कार्यारंभ केला जातो. प्रत्येक मंत्राची सुरुवात ओमकाराने होते, तद्वत् प्रत्येक कार्याचा आरंभ श्री गणेशाच्या स्मरणाने होतो.
श्री गणेशाचे रूप पाहून आपण त्यातून कोणता बोध घ्यावा, हेही सांगितले गेले आहे. श्री गणेशाचे शिर हत्तीचे आहे. घरातील कर्त्या व्यक्तीने हत्तीप्रमाणे गंभीर आणि दूरदर्शी असणे अपेक्षित आहे. हत्तीप्रमाणेच कोणतीही कृती खूप विचारपूर्वक करणे अपेक्षित आहे. जबाबदार व्यक्तीने हत्तीसारखेच शांत आणि संयमी राहायला हवे. अर्थात, क्रोधावर नियंत्रण मिळवायला हवे. धैर्य असल्याखेरीज कोणतेही कार्य तडीस जाऊ शकत नाही.
धैर्य आणि संयमाची शिकवण मंगलमूर्ती आपल्याला देतो. उंदीर हे गणेशाचे वाहन आहे. उंदीर बिळात राहतो आणि विशिष्ट हेतूनेच बाहेर पडतो. त्याप्रमाणे आपल्या योजना गुप्त ठेवून कार्यसिद्धी झाल्यावरच ते प्रकट करावे, अशी शिकवण मूषकाच्या माध्यमातून आपल्याला मिळते. अशा प्रकारे कार्यरत राहिल्यास कुटुंबाची प्रगती होते. गण या शब्दाचा अर्थ राज्य असाही होतो. गणेश हा सर्व गणांचा स्वामी आहे.
गणेशाने जन्मानंतर सर्व गणांना एकत्र केले आणि त्यांचे यशस्वीरीत्या नेतृत्व केले. अनेक दानवांचा अंत केला. सर्वांना सोबत घेऊन कार्यरत राहणे हेच गणेशाचे लक्ष्य होते. कार्तिकस्वामी हा सेनापती होता, तर गणेश बुद्धिमत्ता आणि युक्तीच्या आधारे देवशक्तींना संघटित करण्याचे कार्य करीत असे. बुद्धिचातुर्य आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे जे कार्य गणेशाने केले, ते अद्वितीय असून, गणेशापासून हे गुण आपण घेतले पाहिजेत.
श्री गणेशाचे दर्शन समोरून घेतल्यास बुद्धी आणि सिद्धी प्राप्त होतात. मात्र, गणेशाचे दर्शन मागून घेऊ नये, असे सांगितले गेले आहे. कोणत्याही संकटाच्या वेळी पाठ दाखवू नये आणि हिमतीने प्रत्येक परिस्थितीचा सामना करावा, असा अर्थ त्यात अभिप्रेत आहे. संकटांपासून तोंड लपविले म्हणून संकटे थांबत नाहीत. त्यांचा आमनेसामने मुकाबला केला, तरच संकटे दूर होतात. संकटमोचक गणेशाकडून हा गुण आपण ग्रहण करायला हवा. वाईट काळ आल्यानंतर घाबरून, हताश होऊन काहीच उपयोग होत नाही.
हिंमत कायम ठेवून संकटांचा मुकाबला करीत राहिल्यास काही दिवसांतच संकटे गायब होतात. श्री गणेश विघ्नांचा नायनाट करतो, हे आपण या अर्थानेही समजून घेतले पाहिजे. गणेशाने ठार केलेल्या राक्षसांमध्ये अहंतासुर, कामासुर, क्रोधासूर, मायासूर, लोभासूर आदींचा समावेश आहे. अहंतासुर अहंकाराचे, कामासूर कामाचे, क्रोधासूर क्रोधाचे, मायासुर मायेचे तर लोभासूर हे लोभांचे प्रतीक आहे. गणेशाचे पूजन आपल्याला अहंकार, काम, क्रोध, माया आणि लोभापासून मुक्त ठेवते, अशी धारणा त्यामुळेच आहे. हे सर्व मनुष्याच्या आत वसलेले मनुष्याचे शत्रू आहेत. गणेशाने असुरांचा नाश करण्यासाठी अंकुश या शस्त्राचा वापर केला आहे. आपण आपल्या आत असलेल्या कामक्रोधादी शत्रूंवर अंकुश ठेवला पाहिजे, हाच यातील संदेश होय.
गणेश चतुर्थीला भल्या सकाळी नदीकाठी स्नान करून तेथील अथवा शेतातील माती चाळून त्यात पाणी मिसळून त्यापासून गणेशाची मूर्ती स्वतःच्या हाताने तयार करावी, असे सांगितले गेले आहे. गणेशाला त्या मूर्तीमध्ये विराजमान होण्यासाठी आवाहन करावे आणि नंतर त्याची पूजा करावी, असे शास्त्र सांगते. गणेशोत्सवात आपण मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून दहा दिवस या मूर्तीची पूजा करतो. दहा दिवसांनंतर ही मूर्ती नदीत विसर्जित केली जाते.
गणेशाचे निर्माल्य नदीत विसर्जित करू नये. तसेच गणेशाला दाखविला गेलेला नैवेद्य मुलांना वाटावा आणि तद्नंतर कुटुंबासमवेत स्वतः ग्रहण करावा. दहा दिवस अशा प्रकारे उपासना केल्यावर विघ्नहर्त्या गणरायाचा आशीर्वाद लाभतो, असे शास्त्र सांगते. गणेशाचे दहा दिवस पूजन करणे म्हणजेच त्याचे गुण आत्मसात करणे. गणेश हा गुणांचा अधिपती आहे. कलांची देवता आहे. बुद्धीचे दैवत आहे. गणेशोत्सवानिमित्त त्याची पूजा करताना आपण त्याचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया.
– सु. ल. हिंगणे