नवी दिल्ली – भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा जरी कसोटी क्रिकेटला आता सरावला असला तरीही समर्थ सलामीवीर म्हणून त्याने आता स्वतःला सातत्याने सिद्ध केले पाहिजे, असे मत माजी कसोटी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे.
रोहितसमोर आता एक मोठे आव्हान आहे. एक सलामीवीर म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये रोहितला स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे. कारण रोहितने आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. पण इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळणे सोपे नसते. त्यामुळे आता रोहितची मोठी कसोटी इंग्लंडमध्ये पाहायला मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
भारतीय संघ इंग्लंडमध्ये कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी खेळणार आहे. भारताचा सामना यावेळी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. आतापर्यंत इंग्लंडमधील कसोटी मालिकेत भारताला सातत्याने यश मिळवता आलेले नाही. त्यामुळे भारतासाठी ही मालिका सर्वात महत्त्वाची असेल. त्याचबरोबर यावेळी रोहितबरोबर सलामीला शुभमन गिलला पाठवायचे की, मयंक आग्रवालला हा निर्णयही संघाला घ्यावा लागणार आहे, असेही ते म्हणाले.
रोहित आता चेंडू शरीराच्या जास्त जवळ जाऊन खेळतो, त्यामुळे त्याची फलंदाजी चांगली होते. ऑफ स्टम्पच्या बाहेरचे चेंडू तो सोडून देतो, त्याचबरोबर त्याचे फुटवर्कही खूप सुधारले आहे. मात्र, इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना त्याला प्रत्येक सामन्यात जबाबदारीनेच फलंदाजी करावी लागेल. एक फलंदाज म्हणून रोहितला काही बदल नक्कीच करावे लागतील. इंग्लंडचे वातावरण आणि खेळपट्टया या वेगळ्या असतात आणि तिथे फलंदाजी करणे सोपे नसते, असेही त्यांनी सांगितले.
इंग्लंडमध्ये जर रोहितला चांगली फलंदाजी करायची आहे तर त्याला नक्कीच बदल करावे लागतील. यावेळी रोहितला इंग्लंडमधील खेळपट्टीनुसार फलंदाजीमध्ये काही बदल करावे लागतील. कारण इंग्लंडमधील खेळपट्टी ही गोलंदाजांना मदत करत असते आणि तिथे फलंदाजी करणे सोपे नसते. त्यामुळे आता रोहित आपल्या फलंदाजीत कोणता बदल करतो, ते महत्त्वाचे ठरणार आहे, असेही मांजरेकर यांनी सांगितले.