पुणे – सामान्यपणे रानगवा हा जंगलातूनच प्रवास करतो. मात्र, तो शहराच्या हद्दीत येणे हा त्या भागांतील अडथळ्यांमुळे निर्माण झालेली स्थिती आहे, की गव्यांची संख्या वाढ आहे? हे अभ्यासानंतरच निश्चितपणे सांगता येईल. यामुळेच पश्चिम घाट परिसरातील गव्यांबाबत व्यापक अभ्यास होणे गरजेचे,’ आहे असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले.
पुण्यात मंगळवारी कोथरूड भागात रानगवा आला. त्याच्याबाबत माहिती मिळताच, तो कुठून आला? याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. गव्याच्या आगमनाबाबत अनेक चर्चा रंगू लागल्या. या विषयाचा आढावा घेण्यासाठी “प्रभात’ने वन्यजीव अभ्यासकांशी संपर्क साधला.
याबाबत गव्याचे अभ्यासक कुणाल साळुंखे म्हणाले, “महाबळेश्वर, सातारा आणि जावळी खोऱ्यातील जंगलात गव्यांचे पूर्वीपासून वास्तव्य आहे. या भागातून गव्यांचे स्थलांतरण होत असते. स्वभावाने अतिशय शांत आणि भित्रा असणारा हा प्राणी तब्बल 50 ते 60 चौरस किलोमीटरचा प्रवास करू शकतो. मादी गवा शक्यतो कळपाने फिरते. तर, नर गवा हा प्रजनन कालावधीनंतर एकटाच प्रवास करतो. याच काळात स्थलांतरण करत तो दूरवरचे अंतर पार करतो. पुण्यात आढळलेला गवा हा अशाच प्रकारे भटकत शहरात आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.’
“वाघ हा गव्यांचा मुख्य भक्षक आहे. मात्र, पश्चिम घाट विशेषत: ताम्हिणी ते भोर या भागात वाघ फारसा आढळत नसल्याने गव्यांना शत्रूच उरलेला नाही. त्यामुळे सुरक्षित वातावरणात गव्यांची संख्या वाढत असल्याने ते अधिक दूरवर स्थलांतर करत असावेत. अथवा येथील जंगलांमध्ये अतिक्रमण वाढल्यानेदेखील गवा शहर हद्दीत येण्याची घटना घडली असावी. या घटनेमागचे निश्चित कारण हे परिसरातील गव्यांचा सविस्तर अभ्यास केल्यानंतरच सांगत येईल,’ असेही साळुंखे यांनी सांगितले.