भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा ट्वेंटी-20 सामना सुरु असताना कर्णधार रोहित शर्माने तिसऱ्या पंचांना शिव्या घातल्या असल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. या प्रकारची दाखल घेऊन रोहितवर कठोर कारवाई करण्यात येऊ शकते.
दरम्यान भारताने नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. परंतु बांगलादेशच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात करून भारतासाठी चिंतेचं वातावरण निर्माण केलं. बांगलादेशनं पहिल्या पॉवर प्ले मध्ये एकही विकेट न गमावता 54 धावा केल्या. सहाव्या षटकात भारताला यश मिळालं होतं, परंतु यष्टिरक्षक रिषभ पंतकडून अजानतेपणानं चूक घडली आणि ती भारतासाठी डोकेदुखी ठरली आहे.
सहाव्या षटकात रोहितनं चेंडू फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या हाती सोपवला. त्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रिषभनं स्टम्पिंग करताना लिटन दासला माघारी पाठवले. पण, तिसऱ्या पंचांनं रिषभची एक चूक पकडली अन् बांगलादेशच्या फलंदाजाला जीवदान मिळालं. पंतनं चेंडू स्टम्पच्या पुढे पकडून स्टम्पिंग केली आणि त्यामुळे तिसऱ्या पंचांनी नो बॉल देत लिटन दासला नाबाद ठरवलं.
त्यानंतर सातव्या षटकात रोहितनं लिटनचाच झेल सोडला. पण, त्यानंतर पंतनेच टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. पंतनं लिटन दासला धावबाद करून माघारी पाठवले. लिटनने 21 चेंडूंत 4 चौकारांसह 29 धावा केल्या. बांगलादेशनं 10 षटकांत 1 बाद 78 धावा केल्या.