मुंबई : भाजप आमच्या आमदारांशी संपर्क साधत असून प्रलोभनं दाखवली जात आहेत, असा थेट आरोप कॉंग्रेसकडून करण्यात आलेला आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर आता फोडाफोडीचे राजकारण सुरू झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा आरोप केला आहे. भाजप सध्या जे काही वागत आहे ते घटनाबाह्या वागत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
वडेट्टीवार म्हणाले, सद्य स्थिती पाहता एकीकडे भाजपने सत्तेतून माघार घ्यावी, अन्यथा मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापन करावी. नाहीतर थेट सांगून टाकावे की, आम्ही सत्ता स्थापन करत नाही. मात्र ते पुढेही जात नाहीत व मागे देखील येत नाहीत. केवळ त्यांनी सत्तेचं घोंगड भिजत ठेवले आहे. आमच्याशिवाय कोणी नाही ही भूमिका लोकशाहीला धरून नाही. भाजप आता जे काही करत आहे, ते घटनाबाह्य करतं आहे, असा आमचा आरोप आहे. राज्यात जर राष्ट्रपती राजवट लागू होत असेल तर त्याला संपूर्णपणे जबाबदार भाजप असेल, असे त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका निभावणार आहे. म्हणून जबाबदारी भाजपा आणि शिवसेनेची आहे. ते जर अपयशी ठरत असतील तर त्यावेळी आमची भूमिका आम्ही ठरवू.
आमदारांच्या फोडाफोडीबद्दल वडेट्टीवार म्हणाले, आमदार फुटीची आम्हाला अजिबात भीती नाही. आमचे 44 शिलेदार आपल्या ठिकाणीच आहेत. मात्र हे नक्की आहे की, आमच्या आमदारांशी काहीजण संपर्क साधत आहेत. उद्या बळजबरी करणे, धाक दाखवणे, धमकावणे हा प्रकार निश्चितच होऊ शकतो. यासंदर्भात आम्ही राज्यपालांना भेटणार आहोतच. जर 25 वर्षांपासूनचा असलेला त्यांचा मित्रपक्ष हे जर सांगत असेल की, सत्ताधारी धमकावत आहेत. भाजपकडून धमक्या येत आहेत. फोडाफोडीचं राजकारण होईल. तर निश्चितपणाने त्यांना जे वाटतं आहे, तेच आमच्याही लोकांच्या संदर्भात आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.