मुंबई – – शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी सुरु आहेत. भाजप पक्षाने ज्याप्रकारे शिवसेना फोडली त्या प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडणार अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याच चर्चांवरून ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रातील पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी भाजप पक्षावर आरोप केले आहे.
रोहित पवार म्हणाले,’ज्याप्रकारे शिवसेनेत दोन गट पाडले, त्याप्रकारे पवार कुटुंबातही फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव आहे. शिवसेनेनंतर आम्हाला लक्ष्य केलं जाऊ शकतं अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी पवार कुटुंबात कोणतेही हेवेदावे नसून, सर्वांचं उद्दिष्ट स्पष्ट आहे’ असेही सांगितल.
तुमच्या आणि अजित पवारांच्या नात्यात दुरावा असल्याची चर्चा अनेकदा झाली. तुमचे आणि त्यांचे संबंध कसे आहेत? मुलाखतीत पुढे असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले,’अजित पवारांनीच मला जिल्हा परिषद आणि आमदारकीचं तिकीट दिलं. माझं लग्नही त्यांनीच ठरवलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला मोठं व्हायचं असतं, तेव्हा आपल्या लोकांसोबत स्पर्धा करायची नसते. आम्ही कौटुंबिक भांडणात वेळ वाया घालवत नाही”. असं म्हणत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.