श्रीकांत कात्रे
माणदेशी फाउंडेशन आणि माणदेशी महिला सहकारी बॅंक या दोन्ही संस्थांनी महिला सक्षमीकरणासाठी केलेले काम अतुलनीय आहे. या कामामुळे अनेक महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. संघर्षातून वाटचाल केली. रोहिणी वाघमारे यांनी गरिबीशी झगडत रिक्षा चालवण्यासाह वेगवेगळे व्यवसाय करीत आर्थिक स्थिरता मिळवली. केवळ स्वतःच्या प्रपंचाचा विचार त्यांनी केला नाही तर आपल्यासोबत इतर कष्टकरी महिलांनाही आर्थिक स्थिरता देण्यासाठी त्यांनी सुरू केलेले प्रयत्न कौतुकास्पद असेच आहेत…
पुरूषांची मक्तेदारी असलेल्या रिक्षाव्यवसायात काही मोजक्या महिलांनी जम बसविला आहे. त्यात रोहिणी भास्कर वाघमारे यांनी ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा वसा जपला आहे. पण त्या केवळ रिक्षा चालवित नाहीत. त्या कपडे शिलाईचे काम करतात. त्या आंबेडकरी साहित्याची विक्री करतात. विविध प्रकारच्या मूर्तींची विक्री करतात. विविध प्रकारची ज्वेलरी स्वतः तयार करून त्याची विक्री करतात. लहानपणापासूून त्यांचा असा हा खडतर प्रवास सुरू आहे.
परिस्थितीशी संघर्ष करण्याचे जणू त्यांना बाळकडूच मिळाले आहे. कष्ट करण्याच्या तयारीबरोबरच परिस्थितीशी दोन हात करून आपल्याबरोबर इतरांना आधार देण्याची त्यांची वृत्ती प्रेरणादायी अशीच आहे. आईवडिलांची परिस्थिती खूपच वाईट होती. कधी पायाला चप्पल नाही तर चांगले कपडेही मिळण्याची वाणवा. लहानपणीच अशा गरिबीशी संघर्ष करीत त्यांच्या त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. नंतर एका अपंग मुलाशी लग्न झाले. त्यांनाही नोकरी नव्हती. त्यामुळे संसार चालविण्यासाठी त्यांनाच हातपाय हलविणे क्रमप्राप्त होते. ड्रेस डिझायनिंग आणि गारमेंटचे प्रशिक्षण घेऊन कपडे शिवण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला.
त्यावरच आठ वर्षे उदरनिर्वाह चालला. त्याबरोबरच आंबेडकरी साहित्याची विक्री त्या करतात. या साहित्याच्या पुस्तकांची 50 किलो वजनाची पेटी डोक्यावरून वाहून नेत त्यांनी विक्री केली. पेटी डोक्यावरून नेण्याऐवजी ती स्वतःच्या रिक्षातून न्यावी, यासाठी त्यांच्या पतीने त्यांना मदत केली. मग त्या रिक्षाने जाऊ लागल्या. त्यातूनच तीन वर्षापूर्वीपासून त्यांच्या रिक्षा व्यवसायाची सुरवात झाली. पुणे स्टेशन परिसरात राहणाऱ्या रोहिणी वाघमारे ग्राहकांना पुण्यातील कोणत्याही भागात सुरक्षित पोहचवितात. त्यापूर्वीपासून त्या पितळी वायर आणि क्रिस्टलचा उपयोग करून ज्वेलरी तयार करतात. सध्या रिक्षा चालवत असल्या तरी ज्वेलरीचा व्यवसाय त्यांनी सुरू ठेवला आहे. प्रति शिर्डी असलेल्या साई मंदिर परिसरात त्यांचा स्टॉल आहे. तिथे त्या कानातील, ब्रेसलेट, अँकलेट अशी ज्वेलरी, विविध प्रकारच्या तयार मूर्ती विकतात.
तिखट मीठ लावलेली काकडीही विकतात. एका बाजूला त्या कष्ट करीत असतानाच आता पतीलाही चांगली नोकरी मिळाली आहे. घरात सासू, दोन मुली आहेत. आपले लहानपण गरिबीत आणि कष्टात गेले. पण आता मुलींना चांगले शिक्षण द्यायचे आहे, त्यातील एकीला नेव्हीचे प्रशिक्षण देणार आहे, असे त्या सांगतात. हा संघर्ष सुरू असतानाच माणदेशीशी त्यांचा संपर्क आला. माणदेशीने त्यांना मोठे प्रोसाहन दिले. खडतर परिस्थितीत कष्ट करून कुटुंबाला सावरणारी मी एकटीच नाही. तर अनेक महिला परिस्थितीशी संघर्ष करीत स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत, हे मी माणदेशीमुळे पाहिले. आपणही उभे राहू शकतो, असा आत्मविश्वास मिळाला. माणदेशीच्या बिझनेस सहली, व्याख्याने, विविध कार्यशाळांना जाता आले.
छोट्याछोट्या व्यवसायातून उभ्या राहिलेल्या महिला पाहून मनाला उभारी मिळाली. अधिकाधिक काम करण्याची उर्मी निर्माण झाली. लॉकडाऊनच्या काळात सारेच बंद होते. माणदेशीे दिलेल्या आर्थिक मदतीतून ज्वेलरीचे साहित्य आणले. मन खचण्यासारखी परिस्थिती आली की माणदेशीने वेळोवेळी आधार दिला, असे त्या नमूद करतात. एखाद्या महिलेने रिक्षा व्यवसाय करणे म्हणजे आव्हानच, असे विचारताच त्या म्हणाल्या, आपण जसे वागतो, तसेच आपल्याशी लोक वागतात.
त्यामुळे सकारात्मक राहत हा व्यवसाय करते. सर्वच रिक्षाचालक मला नेहमीच चांगले सहकार्य करतात. पतीच्या वाचनाच्या आवडीमुळे आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने या पुस्तकांची विक्री सुरू केली. व्यवसायही होतो आणि डॉ. आंबेडकर यांचे विचार पोहचविणण्याचे मोठे कामही होते, असे त्या सांगतात. त्या झोपडपट्टीत राहतात. त्यांना अपंगांचे प्रश्न, विधवा गरीब महिलांचे जगणे त्यांना माहिती आहे.
या सर्व घटकांसाठी काही काम करायचे म्हणून त्यांनी प्रगती लोकसेवा संस्था सुरू केली. त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्या झटत आहेत. दोन तीन जणींना त्यांनी रिक्षा चालविण्यास शिकवली. त्या महिला आता रिक्षाव्यवसायही करीत आहेत. या संस्थेमार्फत अशा व्यक्तींना, अशा महिलांना माणदेशीपर्यंत पोहचवून त्या स्वतःचे घर चालवू शकतील, असे प्रशिक्षण देण्याचे त्यांचे नियोजन आहे. आपला खडतर प्रवास लक्षात घेऊन या संस्थेद्वारे गरजूंना आधार मिळेल, असेच काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःचे जग निर्माण करून रोहिणी थांबल्या नाहीत तर इतर अनेक महिलांचे जगणेही समृद्ध व्हावे, म्हणून त्या करीत असलेले प्रयत्न केवळ कौतुकास्पद नव्हे तर प्रेरणादायीच आहेत.