पाचगणी – गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी स्वतः केली होती. त्यानंतर आम्ही मागणी केल्यानुसार राज्य शासनाने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत अद्याप पोहोचलेली नाही, याची खंत आहे. यावर आगामी अधिवेशनात जाब विचारणार आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले.
अतिवृष्टीने जावळी व महाबळेश्वर तालुक्यातील नुकसानीची पाहणी करून दरेकर यांनी राज्य शासनाला मदतीबाबत आवाहन केले होते. त्यानंतर राज्य शासनाने मदत जाहीर केली होती. ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे किंवा नाही, याची माहिती घेण्यासाठी दरेकर यांनी या भागाचा दौरा केला. त्यानंतर महाबळेश्वर येथे वन विभागाच्या हिरडा नाका येथील विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, अतिवृष्टीत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश व मराठवाड्यात प्रचंड नुकसान झाले.
याबाबत तातडीने मदत करण्याचे आवाहन सरकारला केले होते. महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादकांना मोठा फटका बसला. आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यात सरकारचे अपयश दिसून आले आहे. 2019 पासून पर्यटन व्यवसायावर संकट आहे. त्यावर आधारीत अनेक व्यवसाय टाळेबंदीपासून अडचणीत आहेत. सरकारला पर्यटनातून मोठा महसूल मिळतो. या व्यवसायावर अवलंबून असलेले सर्व जण अडचणीत असले, तरी राज्य शासनाने एक दमडीचीही मदत जाहीर केली नसल्याची खंत आहे.
दरम्यान, महाबळेश्वर पालिकेकडून घरपट्टीत सवलत मिळण्याबाबत माजी नगरसेवक रवींद्र कुंभारदरे यांनी दरेकर यांना निवेदन दिले. त्यावरून दरेकर यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केला. मागच्या दौऱ्यावेळी मी मुख्याधिकाऱ्यांना याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे व माझ्याकडे पाठवण्याची सूचना केली होती; परंतु त्यांनी प्रस्ताव दिला नाही. त्यांच्या कामाविषयी मी आगामी अधिवेशनात जाब विचारणार आहे, असे दरेकर म्हणाले. तालुक्यातील सर्वच रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून, ते सुधारण्याची मागणी करून अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात दरेकर यांच्याकडे तक्रारी केल्या. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख तानाजी भिलारे, तालुकाध्यक्ष मधुकर बिरामणे, सनी मोरे, ओंकार दीक्षित उपस्थित होते.