मुंबई – करोनाचा धोका संपला तर ऑस्ट्रेलियाचा दौरा होऊ शकतो. मात्र, गेल्यावेळी झालेल्या मालिकेत भारतीय संघ जसा जिंकला होता त्याची पुनरावृत्ती यंदा करण्याचे लक्ष्य असले तरीही स्टिव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्या संघातील पुनरागमनामुळे हा दौरा भारतासाठी सोपा नसेल असा गर्भित इशारा भारताचा हिटमॅन रोहित शर्मा याने दिला आहे.
करोनाचा धोका नियंत्रणात आला तर क्रीडा क्षेत्राला दिलासा मिळेल व पुढील काळात सर्व नियोजित सामने सुरू होतील. या वर्षाअखेरीला भारतीय संघ ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी जाणार आहे. या स्पर्धेनंतर भारतीय संघ यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. यापूर्वी भारतीय संघाने केलेला दौरा यशस्वी ठरला होता. त्यात ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात पराभूत करुन संघाने विक्रमी कामगिरी केली होती. मात्र, यंदाची मालिका सोपी नसणार याची कल्पना आहे. यावेळी स्टिव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर संघात परतले असून भारतासमोर ते मोठे आव्हान ठरतील. त्यामुळे भारतीय संघासाठी हा दौरा सोपा नसेल, असे रोहितने व्यक्त केले आहे.
भारताने 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकताना विक्रमी कामगिरी केली होती. 71 वर्षांनंतर भारताने ऑस्ट्रेलियात मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. भारताचा संघ पुन्हा एकदा या ऐतिहासिक कामगिरीची पुनरावृत्ती विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली करण्यासाठी उत्सुक आहे. मात्र त्या वेळेस ऑस्ट्रेलिया संघात वॉर्नर आणि स्मिथ यांचा समावेश नव्हता. चेंडू कुरतडल्याप्रकरणी एका वर्षाच्या निलंबनाची शिक्षा वॉर्नर आणि स्मिथ यांना झाल्याने त्यांना त्या मालिकेला मुकावे लागले होते.
ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळण्यासाठी मी सज्ज आहे. यंदा स्मिथ आणि वॉर्नर ऑस्ट्रेलिया संघात परतले आहेत. खेळाडू म्हणून सामने खेळणे जास्त आवडते, असे रोहितने सांगितले. गेले काही वर्ष आम्ही सातत्याने चांगले खेळत आहोत. ऑस्ट्रेलिया दौरा झाला तर तेथे खेळण्याचा आनंद वेगळाच असेल,असे रोहितने सांगितले.