सातारा – दहा दिवसांच्या लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू होण्याच्या आदल्या दिवशीही गुरुवारी सातारा शहरात किरणा व इतर वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची तुडुंब गर्दी झाली होती. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत होती. शहरातील अनेक ठिकाणी पोलिसांची पथके तैनात होती.
दुकानांसमोर गर्दी होऊ नये, सोशल डिस्टन्सिंग राखले जावे व विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेची पथकेही फिरत होती; परंतु नागरिक त्यांना जुमानत नसल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवताना प्रशासनाची तारांबळ उडाली. त्यामुळे दुपारी दोन वाजल्यानंतर पोलिसांनी कडक भूमिका घेत दुकाने बंद करायला भाग पाडले तरीही अनेक दुकानदार सायंकाळी उशिरापर्यंत चोरून माल विकत होते.
गेल्या काही दिवसांत जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह सातारा शहरातही करोनाबाधितांची संख्या वाढत आहेत. त्यावर दुसरा उपाय सापडत नसल्याने अखेर जिल्हा प्रशासनाने दहा दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनचे निर्बंध 17 ते 22 जुलैपर्यंत कडक असणार आहेत.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी वेळोवेळी आव्हान करूनही नागरिक सोशल डिस्टन्सिंग व इतर नियम पाळत नसल्याने जिल्ह्यात करोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यात अपयश येत आहे. त्यामुळे प्रशासनाने 14 तारखेला लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला; परंतु लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा करता यावा म्हणून तीन दिवसांची मुदत दिली. त्याचा गैरफायदा नागरिकांनी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
नागरिकांनी अनेक दिवसांचा किराणा माल खरेदी करण्याबरोबरच अनावश्यक खरेदीही केल्याचे आजच्या गर्दीवरून जाणवले. बाहेरगावाहून आलेल्या भाजी विक्रेत्यांनी पोवई नाक्यावर पथाऱ्या टाकल्या होत्या. तेथे खरेदीसाठी झुंबड उडाली होती.
संपूर्ण शहरातील रस्ते व दुकानांसमोरही हेच चित्र होते. सोशल डिस्टन्सिंग, वाहनांमधील प्रवासी संख्येचे निर्बंध, मास्कचा वापर आदी निर्देशांचे सर्रास उल्लंघन होत होते. बहुधा लॉकडाऊन लवकर उठणारच नाही, अशा अविर्भावात सातारकरांनी खरेदी केली. तळीरामांनी सुद्धा लॉकडाऊनच्या कालावधीसाठी पुरेसा मद्यसाठा खरेदी केला.
तांदूळ आळी, शेटे चौक, राधिका रोड, मार्केट यार्ड परिसरात गर्दी होती. वाहतूक नियमनासाठी वर्दळीच्या चौकात बॅरिकेडस् उभारण्यात आले होते. मोती चौक, पोवई नाका, राजपथ, राधिका रोड या रस्त्यांवर वाहने पार्किंगला जागा नव्हती. पालिकेने विविध कारवायांमध्ये 44,700 रुपयांचा दंड वसूल केला. कालचा अनुभव लक्षात घेता, गर्दीच्या सर्व ठिकाणी जादा वाहतूक पोलीस तैनात केले होते.