कामशेत – गेल्या पाच दिवसांपासून संततधार पावसामुळे कामशेत येथील इंद्रायणी कॉलणी मधील सर्व अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेल्याने स्थानिक रहिवासी, नागरिकांना पाण्यातून ये-जा करावी लागत आहे. इंद्रायणी कॉलनीच्या पश्चिमेकडे डोंगराचे पाणी तसेच महामार्गालगतचे पाणी इंद्रायणी कॉलनीत येत असल्याने दरवर्षी पावसाळ्यात या कॉलनीतील रस्ते जलमय होतात. मात्र इंद्रायणी कॉलनीमधील पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना त्वचा विकारांनी ग्रासले आहे, तसेच बराच काळ पाणी साचून राहिल्याने डास, मच्छरांची पैदास वाढली आहे. या परिसरात साथीचे आजार पसरण्यास सुरुवात झाली आहे.
इंद्रायणी कॉलनीत ग्रामपंचायत सरपंच, पंचायत समितीचे पदाधिकारी वास्तव्य करीत आहेत, तरी गेल्या काही वर्षांची समस्या सोडविण्यासाठी त्यांना अद्याप यश आले नाही. योग्य नियोजनाचा अभाव आणि नैसर्गिक प्रवाहांवर झालेल्या अतिक्रमणामुळे पावसाचे पाणी लवकर बाहेर निघत नाही. ही कॉलनी तुंबते आणि अनेकांच्या घरात देखील पाणी शिरते, हे दरवर्षी घडत आहे. देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. पर्यायाने नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे.
पावसाळ्यात इंद्रायणी कॉलनीत पाणी साचत असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिलांना कसरत करीत घराच्या बाहेर पडावे लागते. तसेच रस्त्यावर साचलेल्या दूषित पाण्यातून सतत चालल्याने नागरिकांना चिखल्या, डेंगू, खाज असे त्वचा आजार जडत आहेत.
– राजू अगरवाल, स्थानिक रहिवासी.