खडकाळा बीज गुणन केंद्रात गटाराचे पाणी शिरल्याने नुकसान
कामशेत – जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत कामशेत येथील कृषी विभागाच्या तालुका बीज गुणन प्रक्षेत्रात महामार्ग गटारीचे आणि ओढ्याचे दूषित पाणी येत असल्याने रोपवाटिकेचे मोठे नुकसान झाले आहे.
मावळात गेल्या काही काळात आधुनिक पद्धतीने भातलागवडीचे प्रमाण वाढले आहे. त्याच चारसूत्री, एसआरटी या आधुनिक पद्धतीने भात लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. खडकाळा बीज गुणन केंद्रात भात पिकाबरोबरच अन्य पिकांचे बीज सुधारणा व संशोधन केले जाते. महामार्गालगत असलेल्या गटारांमधील सांडपाणी केंद्रात भात शेतीत येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शेतात काम करण्यासाठी मजूर गेले असता दूषित पाण्यामुळे त्यांच्या अंगाला खाज सुटली. तसेच त्वचेच्या अनेक समस्या उद्भवत असल्याने शेतात काम करण्यास मजुरांनी नकार दिला. त्यामुळे भात रोपवाटिका यांच्यावर हा परिणाम होत आहे.
बीज विकसन होण्याऐवजी त्याचा दर्जा खालवण्याची भीती येथील अधिकारी व्यक्त करीत आहेत. याशिवाय रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, चिखलातून अधिकारी व कर्मचाऱ्यांना चालावे लागत आहे. जुना पुणे-मुंबई महामार्गालगत कामशेत मधील कृषी विभागाचे तालुका बीज गुणन प्रक्षेत्र खडकाळा आहे. याची स्थापना 1958 साली महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
या केंद्रात कृषि पर्यवेक्षक, कृषि सहायक आणि ग्रेड वन मजूर आदी तीन जण काम करीत आहेत. या बीज प्रक्रिया केंद्राचा मूळ उद्देश उत्तम प्रकारचे बियाणे उत्पादित करून त्याच्यावर संशोधन करणे तसेच चांगल्या प्रतीचे बियाणे परिसरातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे हा आहे.
या केंद्राच्या क्षेत्रावर मूलभूत, पायाभूत प्रमाणित अशा श्रेणीच्या भात, नाचणी, हरभरा, ज्वारी, गहू आदी बियाणांचे उत्पादन केले जाते. तसेच चारसूत्री पद्धतीने भात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी युरिया ब्रिकेट गोळी खत बनवल्या जातात. तालुका बीज गुणन प्रक्षेत्रावर उत्पादित प्रमाणित बियाणे शेतकऱ्यांना पेरणीसाठी उपलब्ध केले जाते. तसेच भात पिकामध्ये चारसूत्री पद्धतीचा अवलंब करून लागवड केली जाते. शिवाय परिसरातील शेतकऱ्यांना भेटी देऊन या विषयीचे सविस्तर मार्गदर्शन केले जाते.
भात पिकामध्ये चारसूत्रीमध्ये युरिया ब्रिकेटचा वापर केला जातो. त्यामुळे रासायनिक खताची बचत होते. तसेच भात उत्पादनात वाढ होत आहे. तसेच जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. या शिवाय कृषि अवजारांची माहिती व त्यांचा उपयोग कसा करावा, याविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली जाते.
पुणे-मुंबई महामार्गा लगतच्या गटारांचे पाणी मोठ्या प्रमाणात बीज गुणन क्षेत्रात येत आहे, त्या सोबत महामार्गालगतचा अनेक दिवसांपासून साचलेला कचरा वाहून येऊन रोपवाटिकामध्ये अडकून बसल्याने बीज गुणन प्रक्षेत्रात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे शेतमजूर शेतात काम करण्यास तयार होत नाहीत. पाण्यासोबत गाळ देखील येऊन रोपवाटिकेत गेल्याने रोपवटिकेचे नुकसान झाले आहे.
– ज्ञानेश्वर शेळके, कृषी सहायक.