भाटघर – भोर-कापूरहोळ मुख्य रस्त्याला अनेक जोडरस्ते जोडले गेलेले आहेत. संगमनेर (ता. भोर) ग्रामपंचायतीच्या हद्दीत खंडोबाचा माळ येथील उतारावर एका डेव्हलपर्सने जमीन सपाटीकरण करताना पाण्याचा प्रवाह सोडल्याने रस्त्याला ओढ्याचे स्वरूप निर्माण झाले आहे. रस्त्यावरील खडी व मुरूम वाहून गेल्यामुळे या रस्त्याची वाहतूक बंद झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे.
यावर्षी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून जोरदार पाऊस झाल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे. भोर-कापूरहोळ मुख्य रस्त्याला अनेक गावांतून जोड रस्ते मिळालेले आहेत. खंडोबाचा माळ उताराला बंद अवस्थेत असलेल्या भवानी ब्रिक्स स्टाइल्स या कंपनीपर्यंत रस्ता जोडलेला आहे. पंचेचाळीस वर्षांपूर्वी खडी व डांबरीकरणाने हा रस्ता बनविला होता. सद्यस्थितीत भवानी ब्रिक्स टाइल्स ही कंपनी बंद असली तरी येथील शेतकरीवर्ग व छोटे व्यावसायिक या रस्त्याचा वापर करतात. परंतु, एका डेव्हलपर्सने जमिनीचे सपाटीकरण करताना पाण्याचा प्रवाह रस्त्यावर वळवला असल्याने रस्त्यावरील खडी व मुरूम वाहून गेला आहे.
जोरदार पाऊस पडत असताना रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले होते. यामुळे शेतकरी व व्यावसायिकांची या रस्त्यावरून वाहतूक बंद झालेली आहे. शेतकऱ्यांना दुचाकी वाहनही निम्म्या रस्त्यापर्यंत कसेबशे नेऊन रस्त्यावरच पार्किंग करावे लागत आहे. शेतकऱ्यांना खताच्या गोणी एक किलोमीटर अंतरापर्यंत डोक्यावर नेऊन पायी वाहतूक करावी लागते. या भागात नीरा नदी वाहत असल्याने शेतीसाठी पाणी सिंचनाची सोय चांगल्या प्रकारे झाली आहे. शेतकरी ऊस, टोमॅटो, वांगी, मिरची, काकडी अशा प्रकारची पिके घेतात. परंतु, तरकारी वाहतूक बंद झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे.