कराडमध्ये मंगलमय वातावरणात लक्ष्मीपूजन; दिवाळीचा उत्साह कायम
उमेश सुतार
कराड – कराड शहरासह तालुक्यात पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात विधीवत लक्ष्मीपूजन करण्यात आले. लक्ष्मी पूजनानिमित्त लक्ष्मीमातेच्या स्वागतासाठी घरासमोर सडा रांगोळ्या, दारावर झेंडूच्या माळा आणि दिव्यांचा झगमगाटाने संपूर्ण आसंमत उजळून निघाला. अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी लक्ष्मी पूजनाबरोबर आमवस्याच्या पाडव्याचा मुहूर्त साधत चोपडी पूजन अर्थात रोजनिशीचे पूजन केले.
दिवाळी सणाचा समूह. वसूबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा व भाऊबीज असा पाच दिवस चालणारा सणांचा एकत्र उत्सव म्हणजेच दिवाळी. दिवाळी सण सर्वत्र आनंदोत्सवात साजरा केला जातो. यानिमित्त अभ्यंगस्नान, नवीन कपडे, फराळ अशी रेलचेल सुरु असते. काही दिवसांपासून सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु झाली आहे. दिवाळीत महत्वपूर्ण मानला जाणारा रविवारी लक्ष्मी पूजनाचा दिवस होता. घरोघरी मोठ्या उत्साहात लक्ष्मीपूजन करण्यात आले.
लक्ष्मीपूजनाची दोन दिवसांपासून जय्यत तयारी सुरु होती. साफसफाईसह सजावटीला विशेष महत्त्व देण्यात येते होते. लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी घरासमोर सडा टाकून आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. दारावर झेंडूचे तोरण बांधण्यात आले होते. घरातील सर्वांनी नवीन कपडे परिधान करुन पारंपरिक पद्धतीने गोरज मुहूर्तावर मोठ्या उत्साहात लक्ष्मीपूजन केले. लोकांनी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. पूजनानंतर फटक्यांच्या आतषबाजी करण्यात आली. काही व्यापाऱ्यांनी आमवस्येच्या पाडव्याच्या मुहूर्तावर लक्ष्मी पूजनाबरोबरच वही पूजनही केले. व्यापाऱ्यांनी त्यांना वर्षाभराच्या हिशोबासाठी लागणाऱ्या वह्या व अन्य साहित्याचे पूजन केले.
कराड शहरास परिसरात आनंद व प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीतील अतिशय महत्त्वपूर्ण पहाट मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन येथील बाल सुधारगृहात व अन्य ठिकाणी असलेल्या उपेक्षितांना रविवारी पहाटे अभ्यंगस्नान घालून नवीन कपडे व फराळाचे वाटप केले. येथील बाजारपेठेत खरेदीचा उत्साह कायम होता. अनेक ठिकाणी लक्ष्मी पूजनाची लगबग पहावयास मिळत होती.
दिवाळी म्हटलं की, सर्वांच्या डोळ्यासमोर उभा राहतो प्रकाशाचा उत्सव. सर्वत्र लखलखाट, नवीन कपडे, फराळ आणि आनंदी-आंनद असे मंगलमय वातावरण. वासूबारसने दिवाळीची सुरवात झाली. शुक्रवारी धनत्रोयदशी तर रविवारी नरक चतुर्थी साजरी करण्यात आली. यादिवशी लोक घरांची साफसफाई करतात. शारीरीक स्वच्छतेला विशेष महत्त्व आहे. सूर्यादयापूर्वी उठून तेल-उटणे लावून स्नान केले. यादिवशी श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, असे पौराणिक महात्म्य सांगितले जाते. हे व्रत केल्यावर नरकापासून मुक्ती मिळते. अशी लोकांची धारणा आहे. समाजातील काही उपेक्षितांना दिवाळीचा आनंद देण्यासाठी काही सामाजिक संस्थानी पुढाकार घेतला. गरीब गरजूंच्या मुलांना नवीन कपडे फराळाचे साहित्य वितरीत करीत त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यात आली.