नवी दिल्ली : देशाच्या नावावरून सध्या देशभरात गोंधळ निर्माण झाला आहे. कारण देशाचे नाव ‘इंडिया म्हणजे भारत’ असे असताना यातून ‘इंडिया’ हा शब्द वगळण्याची तयारी केंद्राकडून करण्यात येत आहे. याबाबत G-20 समिटदरम्यान, देशाच्या नावात काही बदलही करण्यात आले आहेत. पण अचानक असा बदल करण्यामागे विरोधकांची इंडिया आघाडी कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनी मोदी सरकारला टोमणा मारला आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना खासदार मनोज झा यांनी, मी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना माझ्यासोबत संविधानाचं पठण करण्यासाठी आमंत्रित करतो. राज्यघटनेच्या अनुच्छेद १ मध्ये देशाचं नाव स्पष्टपणे ‘इंडिया दॅट इज भारत’ असे म्हटले आहे. आम्ही त्यांना १९ जुलै पूर्वी असं काहीही म्हणताना ऐकलं नव्हतं. १९ जुलै हा तोच दिवस आहे ज्या दिवशी INDIA आघाडीची स्थापना झाली होती.
पुढे बोलताना,”जर आम्ही आमच्या आघाडीच्या नावाचं अधिक संक्षिप्तीकरण केलं आणि आघाडीचं नाव बदलून इंडिया भारत असं केलं तर जयशंकर काय करणार आहेत?”असा सवाल खासदार मनोज झा यांनी केला आहे. याद्वारे त्यांनी थेट केंद्र सरकारला इंडिया हा शब्द वगळण्यावरुन टोमणा मारला आहे.