कॅंडी :- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे आता त्याच्यावर चाहत्यांनी जोरदार टीका केली आहे. आशिया करंडक स्पर्धेत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत रोहित शाहीन शाह आफ्रीदीच्या गोलंदाजीवर नेहमीसारखाच त्रिफळाबाद झाला.
गेल्या 18 एकदिवसीय लढतींत रोहित डावखुऱ्या गोलंदाजांसमोर पाच वेळा अशा पद्धतीने बाद झाला आहे. रोहितसह चाहत्यांच्या टीकेचा मारा विराट कोहलीलाही सहन करावा लागत आहे. त्यालाही शाहीनसमोर अपयशच आले. तसेच तो देखील डावखुऱ्या गोलंदाजांसमोर चार वेळा बाद झाला आहे.
संघाचा कर्णधार व प्रमुख फलंदाज यांनी अशा पद्धतीने बेजबाबदार फलंदाजी केली तर नवोदितांकडून काय अपेक्षा ठेवणार, असा सवालही चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.
पाकिस्तानविरूध्दच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना मोठी खेळी करता आली नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना शाहीन आफ्रिदी याने तंबूचा रस्ता दाखवला. रोहित शर्मा याने या सामन्यात 22 चेंडूत 11 धावांची खेळी केली तर विराट कोहली याने एका चौकाराच्या मदतीने फक्त चार धावा केल्या.