मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेत सध्या शाब्दिक युद्ध सुरु आहे. संजय राऊत यांनी याअगोदर दोन अग्रलेख लिहून राणेंवर हल्ला चढविला होता. आजही रविवारी सामनाच्या रोखठोकमधून त्यांनी राणेंसह त्यांच्या दोन्ही पुत्र आणि संपूर्ण भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. भारतीय जनता पक्ष हा संस्कार, संस्कृती, नैतिकतेवर भर देणारा पक्ष आहे. निदान त्यावर त्यांची प्रवचने तरी असतात, पण संस्कार व संस्कृती इतरांनी पाळायची, स्वतःवर आले की हात वर करायचे, असा टोला राऊतांनी भाजपला लगावला आहे.
राणेंनी केलल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपने समर्थन केले, असे सांगताना एकेकाळी काँग्रेस नेत्याकडून एक चूक झाली तर काँग्रेसने संबंधित नेत्याला पक्षातून निलंबित करण्याची हिम्मत दाखवली, अशा शब्दात राऊतांनी काँग्रेसचे मोठेपण सांगितले. एका गुजरात निवडणुकीच्या वेळी मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘नीच’ असा करताच भाजपने मोठाच हल्लाबोल केला.
मोदी तर जाहीर सभांतून ”मला ते नीच म्हणाले हो म्हणून अश्रू ढाळत होते. मणिशंकर यांच्या ‘नीच’ शब्दाची गांभीर्याने दखल घेऊन काँग्रेसने अय्यर यांना पक्षातून निलंबित करण्याची हिंमत व नैतिकता दाखविली. नारायण राणे यांनीही तोच गुन्हा केला, पण भाजप त्यांना सरळ पाठीशी घालत आहे, अशी खंत राऊतांनी रोखठोकमधून व्यक्त केली.
भारतीय जनता पक्ष हा संस्कार, संस्कृती, नैतिकतेवर भर देणारा पक्ष आहे. निदान त्यावर त्यांची प्रवचने तरी असतात, पण संस्कार व संस्कृती इतरांनी पाळायची, स्वतःवर आले की हात वर करायचे, असा टोला राऊतांनी भाजपला लगावला आहे.
महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून जे घडवले जात आहे ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात सत्ता गमावली हे दुःख समजू शकतो. पण म्हणून महाराष्ट्रातील टोलेजंग व्यक्ती व राज्याच्या संस्कृतीवर हल्ला करत राहणे योग्य नाही, असेही राऊत म्हणाले.
“नारायण राणे यांना राजकीय मर्यादा आहेत. त्यांचे सगळय़ात मोठे भांडवल म्हणजे ते बोलताना, वागताना मर्यादांचे भान ठेवीत नाहीत. हे भांडवल तोकडे पडत असल्यामुळेच भाजपमध्ये मर्यादा सोडून वागणारे बाहेरचे लोक वापर करण्यासाठी लागतात. “या बेताल बडबडीमुळे महाराष्ट्राची राजकीय समीकरणे बदलण्याची सुतराम शक्यता नाही. उलट या सगळय़ांचे परिणाम भाजपास भोगावे लागतील. भाजपास अस्वस्थता, अस्थिरतेची वाळवी लागेल. राणे यांच्यामुळे महाराष्ट्र भाजपमध्ये बहुजन समाज विरुद्ध इतर अशी सरळ फाळणी होईल. राणेच ती करतील. त्या विघटनास सुरुवात झाली आहे”, असेही राऊत म्हणाले.