– श्रीकांत ना. कुलकर्णी.
काल बुधवारी अभिनेता इरफान खान यांचे निधन झाले. त्यानंतर 24 तास उलटून जाण्याच्या आतच ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन झाले. हिंदी चित्रपट सृष्टीला आणखी एक धक्का बसला. आपल्या जिंदादिल प्रवृत्तीनुसार ऋषी कपूर गेली दोन वर्ष कर्करोगासारख्या असाध्य रोगाशी झुंज देत होते. मात्र शेवटी काळाने त्यांच्यावर मात केलीच.
“लॉकडाऊन’च्या काळात हिंदी चित्रपटसृष्टी आणि चित्रपट रसिकांना बसलेले हे दोन धक्के कधीच विसरता येणार नाहीत. इरफान खान हा मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला होते; मात्र त्यांनी आपल्या सकस अभिनयाच्या बळावर अल्पावधीतच हिंदी चित्रपट सृष्टीत आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. ऋषी कपूर यांचे मात्र तसे नव्हते. अभिनयाची परंपरा असलेल्या कपूर या बॉलिवूडमधील बड्या खानदानाचे ते एक समर्थ वारसदार होते. त्यामुळे हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांनी अगदी सहज सुलभ प्रवेश केला. मात्र नंतर आपल्या अभिनयाच्या जोरावरच त्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवले आणि अमिताभ बच्चनसारख्या दिग्गज अभिनेत्यालाही चांगली टक्कर देत आपले स्टारडमही कायम ठेवले.
अभिनेता म्हणून ऋषी कपूर ही कपूर घराण्याची तिसरी पिढी होती. सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक राज कपूर हे ऋषी कपूर यांचे वडील तर ज्येष्ठ अभिनेते पृथ्वीराज कपूर हे त्यांचे आजोबा. अगदी लहान वयात ऋषी कपूर यांनी “मेरा नाम जोकर’ या चित्रपटात त्याने बालवयातील राज कपूरची भूमिका केली होती. त्यानंतर कोवळ्या वयातच राज कपूर यांच्याच “बॉबी’ या चित्रपटाद्वारे ते नायक बनले. “मैं शायर तो नही’ असे म्हणणारा या चित्रपटातील ऋषी कपूर यांनी रंगवलेला कोवळा नायक प्रेक्षकांना अधिक भावला आणि आपला पहिलाच चित्रपट गाजविण्याचे भाग्य ऋषी कपूर यांना लाभले.
वास्तविक ऋषी कपूर यांच्या आधी त्यांचे ज्येष्ठ बंधू रणधीर कपूर यांनीही चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. त्यांचे काही चित्रपट चाललेही. मात्र त्यांना फार काळ स्वतःचे अस्तित्त्व टिकविता आले नाही. लवकरच दिग्दर्शक बनत त्यांनी अभिनयाला रामराम ठोकला. शिवाय केवळ राज कपूर यांच्यामुळे ऋषी कपूर यांचे कनिष्ठ बंधू राजीव कपूर यांचीही पडद्यावर नायक म्हणून एन्ट्री झाली. मात्र काही चित्रपटानंतर त्यांनीही अन्य व्यवसायात लक्ष घालायला सुरुवात केली. ऋषी कपूर यांनी मात्र शेवटपर्यंत “नॉट आऊट’ राहून कपूर खानदानाची अभिनयाची परंपरा कायम ठेवली. आता त्यांचे चिरंजीव रणबीर कपूर हेदेखील त्यांचे वारसदार बनून अभिनयाची परंपरा चालवत आहेत.
ऋषी कपूर यांचा सिनेसृष्टीत प्रवेश झाला तो काळ होता एका रात्रीत सुपरस्टार झालेल्या राजेश खन्नाचा. त्यानंतर लगेचच ऍक्शन फिल्मचा “शहेनशाह’ बनलेल्या अमिताभ बच्चन या अभिनेत्याचे गारुड संपूर्ण चित्रपटसृष्टीवर पसरू लागले होते. ऋषी कपूर यांचे व्यक्तिमत्व मात्र ऍक्शन फिल्मला साजेसे नव्हते. निरागस हसऱ्या चेहऱ्याचा रोमॅंटिक नायक हीच प्रतिमा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी होती व ती त्यांनी शेवटपर्यंत कायम टिकविली. त्यामुळे “अँग्री यंग मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ इतकाच “खुल्लम खुल्ला प्यार’ करणारा त्यांचा रोमॅंटिक हिरो प्रेक्षकांना आवडला. त्यामुळे त्यांनी अभिनय केलेले जवळजवळ सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले. मग तो “कर्ज’ असो “दिवाना’ असो की “चांदनी’.
अमिताभ बच्चन यांच्यासारख्या सुपरस्टारबरोबर काम करताना ऋषी कपूर यांनी त्यांनाही जोरदार टक्कर दिली. त्यामुळे “अमर अकबर अँथनी’ या चित्रपटात ऋषी कपूर यांचा “अकबर’ ही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिला. सुरुवातीच्या काळात पडद्यावर नीतू सिंग या नायिकेबरोबर त्यांची खुपच छान जोडी जमली. पुढे वास्तव जीवनातही नीतू सिंग त्यांची नायिका (सहधर्मचारिणी) झाली. पुढील काळात ऋषी कपूर यांनी माधुरी दीक्षित, मौसमी चटर्जी, श्रीदेवी आदी त्या काळातील प्रथितयश अभिनेत्रीबरोबरही काम केले.
वय वाढत गेले तसतसे ऋषी कपूर यांनी आपल्या सेकंड इनिंग मध्ये विविध स्वरूपाच्या भूमिका करायला सुरुवात केली होती. “अग्निपथ’ मध्ये त्यांनी चक्क खलनायकाची भूमिका बजावली. तर “कपूर अँड सन्स’ तसेच ‘100 – नॉट आऊट’मध्ये (अमिताभचा मुलगा) त्यांनी वृद्धाची भूमिका खूप छान निभावली होती.
ऋषी कपूर यांचे वडील राज कपूर यांनाही अशीच अकाली एक्झिट घ्यावी लागली होती. नियतीने हेच सूत्र ऋषी कपूर यांच्याबाबतीतही लागू केले होते असेच म्हणावे लागेल. त्यांच्या निधनामुळे जिंदादिल वृत्ती असलेल्या एका चांगल्या अभिनेत्याचा अस्त झाला आहे. यापुढे, स्वतंत्र प्रतिमा असणारा खानदानी अभिनेता अशीच त्यांची हिंदी चित्रपट सृष्टीत कायम ओळख राहील.