पुणे -पेट्रोल, डीझेल, गॅसपाठोपाठ खाद्यतेल आणि किराणा मालाचे भाव वाढले आहेत. तर, उत्पादन आणि निर्यात वाढूनही इंधन दरवाढीचा फटका तांदळाला बसला आहे. यात प्रामुख्याने आंबेमोहर, कोलम, बासमती तांदळाचे भाव सतत वधारत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
यंदा तांदळाने भाववाढीचे सर्वविक्रम मोडीत काढले आहेत. भारतीय बासमती तांदळाला परदेशांत मागणी चांगली आहे. त्यामुळे निर्यात वाढली आहे. तसेच लग्नसराईमुळे देशांतर्गत मागणी जास्त आहे. पुणे शहरात सर्वाधिक मागणी बासमती तांदळाची असते. तर, आंबेमोहोर तांदळालाही सर्वच हंगामात मागणी असतेच. कोलम तांदूळ मध्यमवर्गीय कुटुंबांत नियमित वापरात असतो. मागच्या वर्षीपेक्षा यंदा तांदळाला जास्त मागणी आहे. पुण्यात बासमती तांदूळ मुख्यत: हरियाणा, पंजाब तसेच उत्तर प्रदेश, राजस्थान येथून काही प्रमाणात येतो. तर आंबेमोहोर चंद्रपूर आणि नागपूर तसेच पश्चिम बंगालमधून येतो. तसेच कर्नाटक, नागपूर आणि चंद्रपूर येथून कोलम तांदळाची आवक होते. या सर्व ठिकाणचे अंतर खूप आहे. पेट्रोल-डीलचे दर सातत्याने वाढत आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत बासमती तांदळाला मागणी वाढली आहे. करोनानंतर देशात जोरात लग्नसराईत सुरू आहे. लग्नसराईत आणि परदेशांतून मागणी वाढली आहे. त्यातच इंधन दरवाढीचा फटका बसला आहे. या सर्व कारणामुळे बासमतीचे भाव वाढले आहेत.
– राजेंद्र बाठिया, अध्यक्ष, दी पूना मर्चंट्स चेंबर