मुंबई – कोणीतरी काही करेल याचा विचार न करता बेस्टने स्वत: पुढाकार घेऊन इलेक्ट्रीक बस आणण्याचे क्रांतिकारी पाऊल टाकले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
बेस्टच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त पुनर्विकसित माहिम बसस्थानकाचे लोकार्पण, 12 मीटर्स लांबीच्या इलेक्ट्रीक बसगाड्या, नवीन वातानुकुलीत बस मार्ग तसेच 24 इतर गाड्याचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. माहिम पश्चिम बसस्थानक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सन 1874 ते 2021 हा बेस्टचा प्रवास अभिमानास्पद आहे. वेळेनुसार बेस्टमध्ये बदल होत गेला. इलेक्ट्रीक बस प्रदूषण न करणारी व पर्यावरण पूरक बस आहेत. माहीम बस डेपोचे आधुनिकीकरण झाल्याने कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना देखील दिलासा मिळणार आहे. आम्ही वचननाम्यात म्हटल्याप्रमाने बेस्ट बस आणि लोकल प्रवासासाठी एकच पास किंवा तिकीट यापुढे चालावे, असे नियोजन करण्यात येत आहे.
करोना काळात बेस्टने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली. जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली. करोना काळात बेस्ट अधिकारी आणि कर्मचारी देखील करोनाग्रस्त झाले. काहींचे मृत्यू झाले तरीदेखील बेस्ट थांबली नाही. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे बेस्टचे आधुनिकीकरण शक्य होत आहे. यापुढे ई पास सेवा सुरू करण्याचे विचाराधीन असून एकाच तिकीटावर अनेक सुविधा मिळणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यानी सांगितले.
सेवानिवृत्त एक हजार बेस्ट कर्मचाऱ्यांच्या उपदानाचे प्रदान
बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उपदान वितरणाचा प्रारंभ ठाकरे यांच्या हस्ते झाला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात उपदानाची रक्कम थेट जमा होणार आहे. 1005 सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यासाठी लागणारी रुपये 94.21 कोटी एवढी रक्कम कर्मचाऱ्यांच्या थेट बॅंक खात्यात जमा होणार आहे.