ऐजौल – सीमावादावरून आसामशी पंगा घेणाऱ्या मिझोरामसमोर इंधन टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. त्यातून मिझोराम सरकारने मर्यादित पेट्रोल, डिझेल खरेदीलाच मुभा दिली आहे.
आसाम आणि मिझोराममधील सीमावादाला नुकतेच हिंसक वळण मिळाले. दोन्ही राज्यांच्या सीमेवर 26 जुलैला गोळीबाराची घटना घडली. त्यामध्ये आसामच्या 6 पोलिसांसह 7 जण मृत्युमुखी पडले. त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये तणाव निर्माण झाला. आसाम सरकारने आपल्या नागरिकांना मिझोराममध्ये न जाण्याची सूचना जारी केली. त्यामुळे आसाममधून मिझोरामला जाणाऱ्या वाहनांची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामध्ये इंधनांच्या टॅंकर्सचाही समावेश आहे.
आणखी काही दिवस पुरवठा झाला नाही तर मिझोराममध्ये इंधन मिळणे अवघड होईल. ते संकट ध्यानात घेऊन मिझोराम सरकारने इंधन खरेदीवर मर्यादा आणल्या आहेत. त्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी लागू आहेत.
सीमावादावरून निर्माण झालेला तणाव संपुष्टात आणण्यासाठी आसाम आणि मिझोराम सरकारांनी काही दिवसांपासून सामंजस्याची भूमिका घेतली आहे. त्यातून दोन्ही राज्यांच्या प्रतिनिधींमध्ये बैठकही झाली. त्यामध्ये सीमावादावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याबाबत आणि सीमेवर शांतता राखण्याबाबत सहमती झाली.
त्यानंतर गुरूवारी आसाम सरकारने मिझोराममध्ये न जाण्याची सूचना मागे घेतली. मात्र, पुन्हा हिंसाचार होण्याच्या भीतीने इंधन आणि मालाची वाहतूक करणारे मिझोराममध्ये वाहने नेण्याचे टाळत आहेत.