सोलापूर – उजनीतून कालव्याद्वारे शेतीसाठी ११ जानेवारी ते ११ फेब्रुवारी एक सिंचन आवर्तन देण्यात यावे, तसेच पिण्यासाठी पाणी पुरविण्यास प्राधान्य देऊन उपलब्ध पाण्याचे अत्यंत सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिले.
उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, गतवर्षी पाऊस कमी झाला असून, उपलब्ध पाणी येणाऱ्या पावसाळयापर्यत पुरविण्यासाठी सिंचन विभागाने नियोजन करावे. तसेच पिण्याचे पाणी पुरविण्यास प्राधान्य देण्यात यावे अशी सूचना केली.
यापूर्वी कालवा सल्लागार समितीने मंजूरी दिल्याप्रमाणे पाण्याच्या आवर्तनाचे नियेाजन संबंधितांनी केले नसल्यास त्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून चौकशी करण्यात येईल असे सांगून, आवश्यकतेनुसार आढावा घेऊन कालवा सल्लागार समितीची पुन्हा बैठक घेण्यात येईल असे सांगितले.
उजनी प्रकल्पात सध्या ५.३४ टीएमसी (९.५८ टक्के) उपयुक्त पाणीसाठी आहे. उजनी भिमा प्रकल्पाद्वारे सन २०२२-२३ मध्ये प्रत्यक्ष भिजलेले क्षेत्र २ लाख ५४ हजार २५३ हेक्टर (८४.५० टकके) होते अशी माहिती यावेळी देण्यात आली.
अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी उपलब्ध पाणीसाठा, कालव्यावरील आठमाही प्रकल्पीय पीक रचना, निर्मित सिंचन क्षमता व प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र, मागील पाच वर्षातील पाणीपट्टी वसूली, खरीप व रब्बी हंगाम २०२३-२४ मधील प्रत्यक्ष पाणी वापर, उर्वरित कालावधीसाठी पाण्याचे नियोजनाविषयीची सविस्तर माहिती बैठकीत सादर केली.