नवी दिल्ली :- खुल्या बाजार विक्री योजनेंतर्गत तांदूळ विक्रीवर लावण्यात आलेले “अवास्तव निर्बंध” वाईटरित्या “चुकीचे” ठरले आहेत असा आरोप कॉंग्रेसने केला आहे. केंद्राने केवळ कर्नाटकातील कॉंग्रेस सरकारच्या अन्न भाग्य योजनेला अडथळा आणण्यासाठीच हे निर्बंध आणले होते पण त्याचा आता त्यांनाच फटका बसला आहे असे कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
ओपन मार्केट सेल स्कीम अंतर्गत तांदूळ 34 रुपये/किलो दराने विकण्यावर लावलेले अवास्तव निर्बंध तांदळाच्या अत्यंत कमी खरेदीमुळे चुकीचे ठरले आहेत,” असा दावा त्यांनी केला.
केंद्र सरकारकडे असलेला अतिरिक्त अन्नसाठा 140 कोटी लोकांच्या हितासाठी वापरला जावा अशी अपेक्षा होती, परंतु जानेवारी ते मे 2023 दरम्यान, राज्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या साठ्यांपैकी 95 टक्क्यांहून अधिक साठा भाजपच्या काळात कर्नाटक सरकारने खरेदी केला आहे.
केंद्राने राज्यांना हा साठा खुल्या विक्री योजनेत देण्यास मनाई केली असली तरी आता हाच तांदळाचा साठा केंद्र सरकारला इथेनॉल तयार करण्यासाठी 20 रूपये प्रतिकिलो दराने विकावा लागत आहे.