बैलगाडा शर्यतींचे आयोजन ग्रामदैवत यात्रांमध्येच ः पशुसंवर्धन विभागाच्या सूचना
बैल आणि घोडी एकत्र पळविण्यावर निर्बंध कायम
वाढदिवस, राजकीय वा इतर कारणांसाठी परवानगी नाकारली
लाखणगाव – राजकीय व्यक्तीचे वाढदिवस किंवा इतर वाढदिवस असले, तरी यापुढे आता बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळणार नाही, तसेच ग्रामदैवतांच्या उत्सवांमध्ये बैल आणि घोडे एकत्र पळवता येणार नाही, असा अध्यादेश पशुसंवर्धन विभागाने नुकताच जाहीर केल्याने बैलगाडा शर्यती आयोजकांसह शौकिनांमध्ये खळबळ उडाली आहे. एकूणच सध्याच्या “राजकीय जत्रां’मध्ये बैलगाडा शर्यतींना शासनाने परवानगी नाकारली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना कायमस्वरूपी परवानगी दिली आहे; परंतु महाराष्ट्र सरकारने तसेच न्यायालयाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करूनच या शर्यतींचे आयोजन यात्रा उत्सव समितींना करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामदैवतांच्या यात्रा सोडून इतर, म्हणजे वाढदिवस राजकीय कार्यक्रम अथवा इतर कोणत्याही कारणाने बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येऊ नये आणि अशा स्वरूपाच्या बैलगाड्या शर्यतील परवानगी देऊ नये, असे आदेश पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
सध्या राज्यभरात मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहे. मागील दीड वर्षापासून बैलगाडा शर्यतींना तात्पुरत्या स्वरूपात बंदी उठवल्यानंतर सुरुवात झाली होती. काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींचा अंतिम निकाल दिला असून या शर्यतींना परवानगी मिळाली आहे. ही परवानगी देताना न्यायालयाने घालून दिलेल्या नियम -अटींमध्येच तसेच राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांमध्येच बैलगाडा शर्यतीचे आयोजन आयोजकांनी करावे, असे स्पष्ट सांगितले आहेत. पशुसंवर्धन आयुक्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी देताना त्या गावातील यात्रा-जत्रा उरूस असेल त्याच वेळेस बैलगाडा शर्यतींना परवानगी देण्यासाठी कळविले आहे.
वाढदिवस, राजकीय किंवा इतर कार्यक्रमांसाठी बैलगाडा शर्यतीच्या आयोजनाला परवानगी देऊ नये, असे सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे राजकीय लोकांच्या वाढदिवसाच्या यात्रांचे आयोजन आता बंद होणार आहे. मात्र, या निर्णयामुळे बैलगाडा शर्यतींचे आयोजक आणि शौकिन यांच्यामध्ये नाराजी आहे. या शर्यतींना केंद्राकडून परवानगी मिळाली असली तरी निर्बंध आले असल्याने पुढील काळात मयादित स्वरूपात या शर्यती होणार आहेत.
आयोजकांसाठी नियम तीव्र
बैलगाडा शर्यती आयोजित करत असताना एक हजार मीटरपेक्षा जास्त लांबीची धावपट्टी नसावी. बैल आणि घोडा यांना एकत्र पळविण्यात येणार नाही. या स्वरूपाचे नियम पाळावे लागणार आहे. बैलगाडा मालकांनाही बैलांचे आरोग्य सर्टिफिकेट देणे बंधनकारक आहे. पदवीधर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. आयोजक ांनी योग्य पद्धतीने बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले नाही त्या आयोजकांवर गुन्हे दाखल होणार असून दंडाच्या स्वरूपात शिक्षा किंवा तीन वर्षापर्यंतची शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
वाढदिवसांच्या यात्रांना “खो’
आयोजकांनी यात्रा पार पडल्यानंतर 30 दिवसांच्या आत यात्रेचे चित्रीकरण केलेले शूटिंग, तसेच इतर कागदपत्रांची पूर्तता जिल्हाधिकारी यांच्याकडे करावयाची आहे. ग्रामदैवतांच्या यात्रा आता संपत आल्या असून, बरेच ठिकाणी वाढदिवसांच्या यात्रा सुरू झाल्या आहेत.; परंतु शासनाने घालून दिलेल्या नियम अटी पाहता वाढदिवसाच्या यात्रांना नवीन नियमावलीमुळे मात्र खो बसणार आहे.
शासनाच्या पशूसंवर्धन आयुक्तालयाच्या नवीन नियमावलीचे संघटनेकडून स्वागत आहे. तामिळनाडूमध्येसुद्धा फक्त पोंगल सणाच्या निमित्ताने जानेवारी ते मार्च जल्लिकट्टचे आयोजन केले जाते, तसेच शर्यतीवर नियंत्रण रहावे म्हणून तामिळनाडू सरकारने 5 लाख रुपये डिपॉझिटची नवीन तरतूद केली आहे. आजपर्यंत महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाचे बैलगाडा शर्यती चालू करण्यासंदर्भात महत्त्वाचे योगदान राहिले आहे, तसेच संघटनेने यापूर्वी शर्यती चालू करण्यासाठी 11 वर्ष लढा दिला आहे. पुढील काळात शासनाचा बैलगाडा शर्यतीचा कायदा, नियम-अटी अंमलबजावणी संदर्भात, तसीेच शर्यतीतील गैरप्रकारांविषयी संघटना खंबीर भूमिका घेणार आहे.
– संदिप बोदगे, अध्यक्ष अखिल भारतीय बैलगाडा संघटना (महाराष्ट्र राज्य)