नवी दिल्ली- पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून दोन्ही देशांमध्ये अर्थपूर्ण संवादाची अपेक्षा व्यक्त केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी शरीफ यांना पत्र पाठवून त्यांचे अभिनंदन केले होते. त्यानंतर शरीफ यांनीही मोदी यांना पत्र पाठवून अर्थपूर्ण संवादाची अपेक्षा व्यक्त केली आहे.
जम्मू काश्मीरसह सर्व प्रलंबित मुद्यांवर अर्थपूर्ण तोडगा काढण्यात यावा. दहशतवादाविरोधात लढताना पाकिस्तानने केलेला त्याग सर्वांना माहिती आहे. आता शांतता राखून सामाजिक-आर्थिक विकासावर लक्ष केंद्रीत करूया, असे शाहबाझ शरीफ यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी मोदी यांनी शरीफ यांना पाठवलेल्या या पत्रामध्ये भारताला पाकिस्तानबरोबर विधायक संबंध हवे असल्याचे म्हटले होते. त्या पत्राला उत्तर देताना शरीफ यांनीही पाकिस्तानला भारताबरोबर शांततापूर्ण आणि सहकार्याचे संबंध अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून इम्रान खान यांना अविश्वास ठरावाद्वारे हटवण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी शाहबाझ शरीफ यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली होती.