कोलकता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वाढत्या इंधन दरांबाबत चिंता व्यक्त करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. केंद्र सरकारने इंधनांवरील कर कमी करावेत, अशी मागणीही पत्रातून करण्यात आली आहे.
भरमसाठ इंधन दरांमुळे सामान्य जनतेच्या जीवनमानावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. इंधन दरवाढीमुळे महागाई वाढली आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी आणि महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी इंधनांवरील करांमध्ये कपात केली जावी, असे ममतांनी म्हटले आहे.
केंद्र आणि राज्य सरकारांकडून लावण्यात येणाऱ्या करांचा वाटा इंधन दरांमध्ये निम्म्यापेक्षा अधिक आहे. दिल्लीचा विचार केल्यास तिथे पेट्रोलचा दर शंभरीजवळ जाऊन ठेपला आहे.
दिल्लीत पेट्रोलवर लिटरमागे केंद्र सरकारकडून 32.90 रूपये उत्पादन शुल्क आकारले जाते. तर, राज्य सरकारकडून 22.80 रूपये मूल्यवर्धित कर (व्हॅट) आकारला जातो.