1147 जणांच्या प्राथमिक निवडी; यापुढेही नोकरीच्या संधी देणार : पवार
कर्जत – कर्जत-जामखेडमधील युवक-युवतींसाठी सृजन फाऊंडेशनमार्फत आयोजित केलेल्या थेट नोकरी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यातून कंपन्यांनी 1147 जणांच्या प्राथमिक टप्प्यात निवडी केल्या. हा पहिलाच टप्पा असून यापुढील काळातही नोकरीसाठी शिबीरे व मेळावे घेणार असल्याचे सांगत ही अखंड प्रक्रिया सुरू राहील असे आश्वासन आयोजक रोहित पवार यांनी युवक-युवतींना दिले.
कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयात झालेल्या थेट नोकरी मेळाव्यात राज्यभरातील वेगवेगळ्या 50 कंपन्या सहभागही झाल्या होत्या. तर 5 हजार 70 उमेदवार या मेळाव्यासाठी येथे आले होते. गर्दीचा प्रतिसाद या मेळाव्यात मोठा मिळाल्याने रोहित पवार यांनी नोकरी मिळणे बाबतची संख्या मोठी असल्याने यापुढील काळातही वेगवेगळ्या औद्योगिक कंपन्यांशी संपर्क साधून या दोन तालुक्यात ही प्रक्रिया सातत्याने राबविण्याचा निर्णय घेतला.
आज सहभागी झालेल्या कंपन्यांच्या मार्फत यापुढील काळातही कर्मचाऱ्यांची भरती या परिसरातूनच होणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये कर्जत व जामखेड परिसरातील तरुण व तरुणींसाठी या ठिकाणीच करियर प्लॅनिंग शिबिरही होणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, संजय तोरडमल, बाळासाहेब साळुंके, मधुकर राळेभात यांची भाषणे झाली. काकासाहेब तापकीर, किरण पाटील, देवीदास गोडसे, चंद्रकांत राळेभात, अभिजीत तांबिले, सुभाष गुळवे, तात्या ढेरे, संजय वराट, अमित जाधव, वसंत कांबळे, सचीन सोनमाळी, नितीन धांडे, शरद शिंदे, रघुनाथ काळदाते, स्वप्निल तनपुरे, अशोक जायभाय, ऋषिकेश धांडे, सुनील शेलार आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीराम सातपुते यांनी केले.