नवी दिल्ली: बहुस्तरिय व्यासपिठावर आंतरराष्ट्रीय संबंधांच्या
मूल्यांसह आपल्या सहकाऱ्यांच्या हिताचा आदर केला जावा, अशी अपेक्षा
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज केली. रशिया, भारत आणि
चीनच्या त्रिस्तरीय परिषदेमध्ये ऑनलाईन सहभागी झाल्यावर त्यांनी हे
मत व्यक्त केले.
भारत आणि चीनमध्ये सीमा भागात झालेल्या संघर्षामुळे तणाव निर्माण झाला असताना या परिषदेत सहभागी झालेल्या चीनचे परराष्ट्र मंत्री वॅंग ई यांच्यासमोर जयशंकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. गलवान खोऱ्यामध्ये चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहिद झाले होते. गेल्या आठवड्यात भारताने हा हल्ला म्हणजे पूर्वयोजनेनुसार केलेली कृती असल्याचे म्हटले होते.
“ही विशेष बैठक काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय
मूल्यांवरील आपला विश्वास दर्शवण्यासाठी आहे. मात्र आजचे आव्हान हे
संकल्पनेबाबत अथवा त्याच्या व्याप्तीबाबतचे नसून त्या मूल्यांच्या
अंमलबजावणीबाबतचे आहे.’ असे जयशंकर म्हणाले.
जगभरातून आंतरराष्ट्रीय कायद्याचा मान राखण्याची, आपल्या
सहकार्यांच्या न्याय हिताचा मान राखण्याची मागणी केली जात आहे.
बहुस्तरिय देऊन समान चांगल्या बाबींना पाठिंबा देऊनच जगाची स्थायी
व्यवस्था उभारली जाऊ शकेल, असे ते म्हणाले.
परराष्ट्र मंत्र्यांचे हे वक्तव्य म्हणजे सतत भारतीय सीमेवर आक्रमक
भूमिकेत वावरणाऱ्या आणि भारतीय सागरात आपल्या हालचाली
वाढवणाऱ्या चीनसाठी दिला गेलेला अप्रत्यक्ष संकेतच मानला जात आहे.
भारताला दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक व्यासपिठावर योग्य स्थान दिले
गेलेले नाही. मात्र नंतर जग बदलले तरी हा ऐतिहासिक अन्याय गेल्या 75 वर्षांपासून दुरुस्त केला गेलेला नाही, असेही जयशंकर यांनी नमूद केले.
भारताने दिलेले योगदान आणि पूर्वीची चूक दुरुस्त करणे या दोन्ही गोष्टी जगाने लक्षात घ्यायला हव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभुमीवर रशिया-भारत आणि
चीन या त्रिस्तरीय विदेश मंत्र्यांच्या परिषदेमध्ये सहभागी होन्याची
भारताची आगोदर तयारी नव्हती. मात्र या परिषदेचे यजमानपद
असलेल्या रशियाच्या विनंतीवरून भारताने या परिषदेत सहभागी
होण्याचे मान्य केले आहे.
संयुक्त राष्ट्रामध्ये सुधारणा व्हायला हवी…
संयुक्त राष्ट्रामध्ये सुधारणा केल्यास जगातील सध्याच्या वास्तवाचे
प्रतिनिधीत्व केले जाऊ शकेल. इतिहासाच्या पलिकडे जाऊन
आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये सद्यस्थितीतील वास्तव दिसायला पाहिजे.
संयुक्त राष्ट्रामध्ये सुरुवातीला 50 सदस्य देश होते. आता ही संख्या
193 झाली आहे. आता हे तथ्य नाकारून पूर्वीची निर्णय प्रक्रिया सुरू
ठेवली जाऊ शकत नाही, असेही जयशंकर म्हणाले. रशिया, भारत आणि
चीन हे जागतिक पातळीवरील अजेंडा निश्चित क्रणारे सक्रिय देश
आहेत. त्यामुळे बहुस्तरियतेमध्ये सुधारणेचे महत्व या तिन्ही देशांनी
मिळून मांडायला हवे, ही भारताची अपेक्षा आहे, असेही त्यांनी सांगितले.