बेघरांना निवारा देण्यास टाळाटाळ : प्रशासनावर दबाव
पुणे – शहरातील बेघरांना दोन घास जेवण देण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि सर्वसामान्य पुणेकर झटत असतानाच; दुसऱ्या बाजूला या चांगूलपणावर पाणी फेरण्याचे काम काही राजकीय मंडळी करत आहेत. या बेघरांना निवाऱ्यासाठी पालिकेने नाइट शेल्टर आणि शाळांमध्ये सुविधा देताच संबंधित भागातील काही लोकप्रतिनिधी आणि नागरिक “या बेघरांना आपल्या परिसरात ठेऊ नये’ असे म्हणून पालिका प्रशासनावर दबाव आणत आहेत.
“हे भटके नागरिक असल्याने त्यांच्यामुळे आमच्या भागात करोनाचे रुग्ण वाढतील’ असा अनाठायी दावा करत “या बेघरांना इथे ठेऊ नये’ असा धमकीवजा इशारा पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला जात आहे. लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे बेघरांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे माणूसकीच्या भावनेतून अनेक पुणेकर पोटाला चिमटा घेत आपल्या घरातील जमेल तेवढे अन्न या नागरिकांना देत आहेत.
तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि काही नगरसेवक या लोकांसाठी पुढे आले असून त्यांच्या जेवणाची जबाबदारी घेत त्यांना फूड पॅकेट वाटत आहेत. या नागरिकांना निवारा देण्याची मागणीही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पालिकेने आपली नाइट शेल्टर आणि शाळा या बेघरांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सेनादत्त परिसर आणि येरवडा परिसरात पालिकेने सुमारे 100 बेघरांना निवारा दिला आहे. मात्र, त्यावेळी प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागला.
काही आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक नागरिकांनी त्यांना ठेवण्यास विरोध केला. “हे बेघर आहेत. रस्त्यावर फिरतात. त्यांना आमच्याकडे का आणता? त्याची सोय दुसरिकडे करा’ असा वाद घातला जात आहे, असे काही अधिकाऱ्यांनी सांगितले. ही निष्ठुरता पाहून प्रशासनही हवालदिल झाले आहे.