मुंबई – शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde fadanvis sarkar) येत्या 15 दिवसांत मंत्रिमंडळात असणाऱ्या 9 भ्रष्ट नेत्यांची हकालपट्टी करावी. अन्यथा 15 दिवसांनंतर त्यांच्याबाबतीतले भ्रष्टाचाराचे पुरावे आम्ही सादर करू, असे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. ज्या मंत्र्यांवर कोर्टाने ताशेरे ओढले आहेत, ज्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत अशा नेत्यांना मंत्रिमंडळातून काढावे.
नुकतंच कोर्टाने हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी संताजी घोरपडे साखर कारखान्यात गैरव्यवहार केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मुश्रीफांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे. असे असतानाच आता विरोधी पक्षांकडून मुश्रीफांसह अन्य मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली जात आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, हसन मुश्रीफ यांच्या ऑडिटरचा जामीन अर्ज नाकारताना त्यांच्यावर पीएमएलए न्यायालयाने अत्यंत गंभीर स्वरुपाचे निरीक्षण नोंदवले आहे. खरंतर या साखर कारखान्याच्या परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे. आता या मंत्रिमंडळात मुश्रीफांना एक मिनिटसुद्धा ठेवू नये. सरकारला शेतकऱ्यांची कणव असेल, तर मुश्रीफांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी आम्ही करत आहोत. सरकारमधील आणखी नऊ मंत्र्यांना काढावेच लागेल, असे वडेट्टीवार म्हणाले.